सेनगाव : कोरोनाचा संसर्गजन्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही महिन्यांपासून काही प्रमाणात बंद असलेले न्यायालयाचे कामकाज १ फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होणार आहे. तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासकीय समितीने राज्यभरातील सर्व न्यायालयांना २९ जानेवारी रोजी दिले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयाचे कामकाज अनेक महिन्यांपासून बंद होते. काही प्रमाणात न्यायालयाचे कामकाज चालू असले, तरी मोजक्या व महत्त्वाच्या प्रकरणासंबंधीच न्यायालयाचे कामकाज चालू होते. त्यामुळे वकिलांसह पक्षकारांना अडचणी निर्माण होत होत्या. अनेक दिवाणी व फौजदारीचे प्रकरणे या काळात प्रलंबित होती. सर्व क्षेत्रातील लाॅकडाऊन कमी होऊन नियमितपणे कामकाज सुरू झाले होते, परंतु न्यायालयाचे कामकाज केव्हा सुरू होणार यांची प्रतीक्षा होती. अखेर एक फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासकीय समितीने घेतला आहे. तसे आदेश २९ जानेवारी रोजी काढण्यात आले आहेत. हे आदेश सर्व न्यायालयाचा स्तरावर पोहोचले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे. या आदेशामुळे प्रामुख्याने प्रलंबित असलेल्या सर्व दिवाणी, फौजदारी प्रकरणांची सुनावणी सुरू होईल. पक्षकारांच्या न्यायालयात प्रलंबित राहिलेला प्रकरणांना सुनावणीसाठी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया येथील वकील संघाचे ॲड.राम तिडके यांनी दिली.