हिंगोली : कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले होेते. हाताला कामच नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. आर्थिक चणचण असल्याने या काळात गुन्हेगारीत वाढ होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोना काळात हिंगोली शहरातील गुन्हेगारी वाढण्याऐवजी कमी होण्यास मदत झाली. २०१९पेक्षा २०२० व २१मध्ये गुन्हेगारी कमी होत गेल्याचे चित्र शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोरोनाने दीड वर्षापासून सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दररोज नवे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाला कडक निर्बंध लागू करावे लागले होते. गतवर्ष लॉकडाऊनमुळे, तर चालू वर्ष कडक निर्बंधांमुळे वाया गेले. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी इतर व्यवसाय ठप्प होते. संचारबंदीचे आदेश असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय इतर कारणांसाठी घराबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. व्यवहार ठप्प असताना व अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने हिंगोली शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. इतर जिल्ह्यात खून, चोरी, जबरी चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी घटनांत वाढ झाल्याचे चित्र असले तरी हिंगोलीत मात्र दरवर्षी गुन्ह्यात घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. २०२० व २०२१मध्ये खुनाची प्रत्येकी एक घटना घडली. जीवे मारण्याचा प्रयत्न २०१९ व २०२०मध्ये प्रत्येकी ६ घटना घडल्या असून, २१मध्ये २ घटना घडल्या आहेत. कोरोना काळात हिंगोली शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
कोरोना काळात संचारबंदी आदेश असल्याने सर्व नागरिक घरातच होते. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढण्यास कोणतीही संधी मिळाली नाही. मात्र, या काळात शासकीय नियमांचे उल्लंघन करणे, परवानगी नसताना दुकाने उघडणे आदी प्रकरणी कारवाई करण्यात आली.
- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर पोलीस ठाणे
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. घरातील कमावत्या व्यक्तिचा रोजगार हिरावला. यातून निर्माण होणारा ताणतणाव कमी करण्यासाठी व्यक्ती व्यसनाधिनतेकडे वळतात. व्यसन व आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्र जवळचे वाटते. त्यामुळे नवीन चेहरे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचारतज्ज्ञ, हिंगोली
शहरातील गुन्हेगारी
खून
२०१९ -०
२०२० -१
२०२१ मे पर्यंत -१
जीवे मारण्याचा प्रयत्न
२०१९ - ६
२०२० -६
२०२१ मे पर्यंत - २
जबरी चोरी
२०१९ -०
२०२० -१
२०२१ मे पर्यंत -१
चोऱ्या
२०१९ - ६१
२०२० - ४८
२०२१ मे पर्यंत -१३
खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार
हिंगोली शहरात कोरोना काळात मारहाण, खून, दरोडा, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे रोखण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या काळात कोणतेही गुन्हे वाढले नाहीत. उलट २०१९मध्ये चोरीच्या ६१ घटना घडल्या होत्या. त्यानंतर २०२०मध्ये घट झाली. यावर्षी ४८, तर २०२१मध्ये जून महिन्यापर्यंत चोरीच्या केवळ १३ घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनांत दरवर्षी घट होत आहे. मात्र, तरीही चोरटे शोधताना पोलिसांची दमछाक होत आहे. पोलिसांनी खबऱ्यांची संख्या वाढविल्यास चोरट्यांचा माग काढण्यास मदत होणार आहे.
गुन्हेगारीत नवे चेहरे का आले ?
कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले आहेत. यावर काम करणाऱ्यांच्या हातचे काम गेले. यातून घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली. त्यामुळे घरातील गरजा भागविण्यासाठी नवीन चेहरे गुन्हेगारीत ओढले जाण्याची शक्यता आहे.
तसेच काम, रोजगार गेल्याने कुटुंबात शाब्दीक संघर्ष वाढत आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी दारूसारख्या व्यसनाला जवळ करण्याचा प्रयत्न व यातून गुन्हेगारी क्षेत्रात न कळत नवीन चेहरे ओढले जात आहेत.