यंदा आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळच सुरू राहिले. त्यातही पालकांची मानसिकता होईपर्यंत कोरोनाचे पुनरागमन झाले. काही ठिकाणी शाळांतच कोरोनाचा व्हायरस घुसल्याचे निमित्त झाले आणि शाळांची टाळेबंदी पुन्हा सुरू झाली. ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र, तो विद्यार्थ्यांच्या किती पचनी पडला, याचे काहीच मूल्यमापन नाही. आता मूल्यमापनाची संधीही हिरावली गेली आहे. तर, सध्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या एवढी वाढली की, आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची भीती आहे. त्यामुळे या काळात परीक्षा होत नसल्याचा पालकांना व मुलांनाही आनंद होत आहे. मात्र, मुलांची गुणवत्ता ही बाब त्यांच्यासाठी चिंतेची बनली आहे.
एकतर शाळा पूर्णवेळ चालली नाही. ऑनलाइन शिक्षणात मुले कुठे आहेत, याची चिंता वाटते. त्यात ही परीक्षा रद्द झाली. शासनाने हा चांगला निर्णय घेतला. मात्र, संस्थांनी कमी खर्चात सगळे भागवल्याने त्यांनी शुल्कही कमी करावे, ही अपेक्षा आहे. यावरही निर्णय घेतला तर पालकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.
अभय भरतीया, पालक
यंदा कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्यच उरले नाही. शाळा नाही, परीक्षा नाही, असा आनंदीआनंद आहे. कोरोनामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य वाटतो. मात्र, ऑनलाइन परीक्षांचा उपाय योजला पाहिजे होता. यात मुलांची गुणवत्ता तरी समोर आली असती.
हरीष कीर्तिवार, पालक
कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे पालक म्हणून एकीकडे परीक्षा व्हावी वाटत असले, तरीही हा योग्य व स्वागतार्ह निर्णय आहे. जसे वर्ग ऑनलाइन भरले, तशाच पद्धतीने परीक्षाही घेतल्या पाहिजे. यामुळे मुलांना परीक्षेची सवय राहील. मागील वर्षीही परीक्षा रद्द झाल्या होत्या.
सचिन बेलोकर, पालक
शासनाने परीक्षा रद्द करणे अयोग्य आहे. एकीकडे गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करायला सांगितले जातात. दुसरीकडे अनेक मुले ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्गच करू शकले नाहीत. त्यांना आता थेट पुढील वर्गात प्रवेश दिल्यास त्यांची शैक्षणिक हत्या केल्यासारखे शिक्षण खाते करीत आहे. अनेक गोरगरिबांची मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांना पुन्हा त्याच वर्गात शिक्षण देऊन मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
दिलीप बांगर, शिक्षण संस्थाचालक
शासनाने कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्या, हा निर्णय योग्य आहे. सध्याची परिस्थितीही तेवढी गंभीर आहे. मात्र, यामुळे गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. शाळा ऑनलाइन झाल्या. काही ठिकाणी त्याही नव्हत्या. त्यामुळे गुणवत्तेबाबत मात्र चिंतेची परिस्थिती आहे.
शिवाजी पवार, शिक्षणतज्ज्ञ
पहिली -२२८५२
दुसरी -२३१८७
तिसरी-२२११२
चौथी -२१८७४
पाचवी-२१३४२
सहावी-२१०३४
सातवी-२०७४०
आठवी-२०५३५