२०१८-१९ मध्ये तालुका स्तरावरून हिंगोलीत वडद व कलगाव विभागून, कळमनुरीतून बोथी, वसमतमधून डिग्रस, औंढा नागनाथमधून पुरजळ तर सेनगावातून कवठा ही गावे गुणाने क्रमानुसार प्रथम आली होती. तर या वर्षात जिल्हा स्तरावर कवठा व बोथीला विभागून प्रथम बक्षीस देण्यात आले होते. २०१९-२० मध्ये तालुका स्तरावर हिंगोलीतून दाटेगाव, कळमनुरीतून येहळेगाव तु., वसमतमधून कुरुंदवाडी, औंढ्यातून लोहरा खु., सेनगावातून जयपूर या गावांनी बाजी मारली. जिल्हा स्तरावर या वर्षातही पुन्हा कुरुंदवाडी व दाटेगावला बक्षीस विभागून देण्यात आले. समान गुण प्राप्त झाल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला.
या स्पर्धेत जिल्हा स्तरावरचे बक्षीस ४० लाख तर तालुका स्तरावरचे बक्षीस १० लाख रुपये आहे. त्यामुळे या गावांना पुढे आणखी चांगली कामे करण्याची संधीही मिळणार आहे. गतवर्षी कोरोनामुळे या गावांना बक्षीस वाटप करण्यात अडचण आली होती. यंदाही नुकतीच निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र यंदा पुन्हा कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यातच या गावांचा योग्य सन्मान होण्यासाठी कार्यक्रम घेण्याचा मानस प्रशासनाचा आहे. त्यासाठी कोरोनाची लाट ओसरण्याची प्रतीक्षा केली जात आहे. पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरणासाठी यापूर्वी पत्र दिले होते; मात्र तूर्त ही प्रक्रिया थांबल्याचे दिसत आहे.