पाणी वेळेवर सोडण्याची मागणीकळमनुरी: मागील काही दिवसांपासून शहरातील नळांना पाणी वेळेवर येईना झाले आहे. त्यामुुळे प्रखर उन्हामध्ये नागरिकांना इतरत्र पायपीट करावी लागत आहे. नगर परिषदेने याची दखल घेऊन नळांना पाणी वेळेवर सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावर खड्डे; वाहचालक त्रस्त
औंढा नागनाथ: शहरातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्याचे कामही गेल्या काही दिवसांपासून अर्धवटच आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना खड्ड्यांचा अतोनात त्रास होत आहे. वेळीच याची दखल घेऊन राज्य रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
वाहतूक व्यवस्था विस्कळीत
कळमनुरी: शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक मोठमोठी दुकाने आहेत. परंतु, काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.
‘नव्याने गतीरोधक उभारा’हिंगोली: खटकाळी बायपास रोडवरील गतीरोधक गत काही दिवसांपासून धोकादायक बनले आहे. दुचाकी वाहनचालकांनी गतीरोधकाच्या बाजूने रस्ता तयार केला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन नव्याने गतीरोधक उभारावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
विजेचा लपंडाव सुरुच
कळमनुरी: गत पंधरा-वीस दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. परंतु, महावितरण लक्ष देत नाही, अशी ग्राहकांची ओरड आहे.
डुकरांचा मुक्तसंचार
हिंगोली: शहरातील शाहूनगर, कमलानगर, ज्योतीनगर आदी नगरांमध्ये डुकरांचा मुक्तसंचार पहायला मिळत आहे. सकाळच्यावेळी लहान लेकरे अंगणात खेळत आहेत. त्यामुळे डुकरांची भीती वाटू लागली आहे. नगर परिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बसस्थानकात कचरा
कळमनुरी: शहरातील बरस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिग साचलेले पहायला मिळत आहेत. गुटख्याच्या पुड्या, नारळे, पाण्याची बॉटल आदी बसस्थानकात परिसरात पडलेले असतात. आगार प्रमुखांना वेळोवेळी सांगूनही याकडे लक्ष दिले जात नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.