हिंगोली : खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण व पुरेशा प्रमाणात कृषिनिविष्ठा उपलब्ध व्हाव्यात तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच जादा दराने खते, बी-बियाणांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांनी दिली. खरीप हंगाम जवळ आला असून, शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहेत. अनेक शेतकरी खरीप पेरणीचे नियोजन करीत आहेत. कृषी विभागही तयारीला लागला आहे. खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखले आहे. तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी होणार नाही, यासाठी जिल्हा स्तरावर एक व तालुकास्तरावर पाच अशी सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर एकूण सहा निवारण समित्यांचीही स्थापना केली आहेे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्क्या पावतीसह खरेदी करावी, पावतीवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी व विक्रेत्यांची स्वाक्षरी, मोबाइल नंबरची नोंद घ्यावी, खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती, त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, पॉकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी, एमआरपीपेक्षा जादा दराने खते, बियाणे, कीटकनाशकाची खरेदी करू नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. काही तक्रारी असल्यास कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे, कृषी विकास अधिकारी एन.आर. कानवडे यांनी केले आहे.
गटामार्फत किंवा सामूहिक खरेदीला प्राधान्य द्या
कोरोना संसर्ग आजार लक्षात घेता कृषी दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गटामार्फत किंवा सामूहिक कृषिनिविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहन करीत एमआरपीपेक्षा जादा दराने कृषिनिविष्ठांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे लाेखंडे यांनी सांगितले.