हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी लॉकडाऊन काळात झालेली हेळसांड लक्षात घेता या लॉकडाऊनमध्ये गैरसोय होऊ नये, यासाठी मजूर आतापासूनच गावाकडे परतत आहेत. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात मजुरांचे जत्थे दिसत आहेत. तसेच खासगी वाहनांद्वारे मजूर गावी निघाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. आता तर शकडो रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता लॉकडाऊन लागण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. शासनही तशी तयारी करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केव्हाही लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मजूर, कामगारांना सर्वात जास्त फटका बसला. एसटी बसेस, रेल्वे यासह सर्वच वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे कामगार, मजुरांना पायी गाव गाठावे लागले होते. मध्यंतरी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मजूर, कामगार पुन्हा मोठ्या शहरात कामानिमित्त दाखल झाले होते. आता पुन्हा लॉकडाऊन लागले तर शहरातच अडकून पडावे लागेल या भीतीने मजूर आतापासूनच गावाकडे परत निघाले आहेत. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात मजूर थांबलेले दिसून येत आहेत. खासगी वाहनानेही मजूर गावाकडे परत असल्याचे चित्र दिसून येत आहे. १२ एप्रिल रोजी शहरात पाहणी केली असता एका ट्रॅक्टरमधून मजूर गावाकडे परभणी जिल्ह्यात जात असताना आढळून आले. हे मजूर नागपूर जिल्ह्यात कामानिमित्त गेले होते.
शहरापेक्षा गाव बरे
कामानिमित्त शहरात गेलो होतो. पुन्हा लॉकडाऊन लागल्यास गतवर्षीप्रमाणे गैरसोय होऊ नये, यासाठी गावाकडे निघालो आहे. लॉकडाऊन लागल्यास वाहने बंद झाली तर शहरातच आडकून पडलो असतो.
- राजेभाऊ चव्हाण, गंगाखेड (फोटो)
नागपूर जिल्ह्यात ऊसतोडीसाठी गेलो होतो. मात्र आता लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये अडकून पडलो होतो. याही वर्षी गैरसोय होईल, म्हणून आम्ही सर्वजण गावाकडे ट्रक्टरने निघालो आहोत.
-राऊडी राठोड, गोदावरी तांडा (जि. परभणी) (फोटो)
नागपूर जिल्ह्यात कुटुंबीयांसह कामानिमित्त गेलो होतो. लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने आमच्या सोबतचे सर्वच कामगार, मजूर गावाकडे निघाले आहेत. आमचीही हेळसांड होऊ नये, यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावाकडे निघालो आहे. गावाकडे किमान उपाशी तरी राहणार नाही.
- केशव राठोड, पोहंडूळ तांडा (जि. परभणी)
परभणी, अकोला मार्गावर गर्दी
१)हिंगोली जिल्ह्यात फारसे कारखाने, उद्योग नसल्याने या जिल्ह्यातील कामगार मोठ्या शहरात कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. आता ते पुन्हा गावाकडे परतत आहेत. बहुतांश मजूर हे खासगी वाहनांनी गावाकडे परत येत आहेत.
२) येथील रेल्वे, बसस्थानकावर आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीसाठी पथक नियुक्त केले आहे. ही माहिती परत येणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचली आहे. कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली तर आठ दिवस दवाखान्यात थांबावे लागेल याची भीती असल्याने हे मजूर खासगी वाहनांनी गाव गाठत आहेत.
३) मजूर, कामगार ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रकच्या मदतीने गावाकडे परत जात असल्याचे परभणी, अकोला, नांदेड मार्गावर दिसून येत आहे. दिवसभरातून कामगारांचे एखादे तरी वाहन या मार्गावरून जात असल्याचे दिसून येत आहे.