हिंगोली : राज्य शासनाने कृषीच्या विविध योजनांसाठी आता महाडीबीटी पोर्टल सुरू केले असून, यावर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य स्तरावरून सोडत पद्धतीने कृषी यांत्रिकीकरणसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. यांत्रिकीकरणाच्या ७११ लाभार्थ्यांची निवड झाली असून, त्यांना ४.४८ कोटींचा लाभ मिळणार आहे.
कृषी यांत्रिकीकरणाकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. अनुदानावर ट्रॅक्टर, ट्रक्टरवर चालणारी अवजारे, सूक्ष्म सिंचनातील साहित्य आदी बाबी मिळतात. त्यामुळे याला मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसत आहे. पॉवर टिलरपासून ते मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत सर्वच बाबींसाठी अर्ज येत आहेत. पूर्वी शेतात बैल, मजूर, पारंपरिक अवजारे वापरून शेतीकामे केली जायची. मात्र, हळूहळू हे बाळगणे परवडत नसल्याने शेतकरी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहेत. काही जण आपली शेती करून इतरांच्या शेतात भाडे आकारून यंत्राने कामे करून देत आहेत. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या योजनेसाठी तब्बल १४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातील काहींचे अर्ज दुबार व तिबार होते. मात्र, तरीही दहा हजार जणांनी लाभासाठी अर्ज केल्याचे सांगितले जाते.
या योजनेची राज्यस्तरावरूनच सोडत झाली आहे. यात ७११ जणांना लाभ मिळणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १७१, कळमनुरी १४५, वसमत १४९, औंढा १३७, सेनगाव १०९ असे लाभार्थी निवडण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आर्थिक तरतुदीनुसार वेगवेगळे लाभ देण्यात आले. त्यात काहींना अनुदान जास्त असून, काहींना कमी आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता संदेश देण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांनी आता त्यांना मंजूर झालेले यंत्र, अवजार खरेदी करायचे आहे. त्यानंतर, ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करून प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. त्याची छाननी झाल्यानंतर थेट सदर शेतकऱ्याच्या खात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे.
याबाबत कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ज्या ७११ लाभार्थ्यांना यांत्रिकीकरण योजनेत साहित्य खरेदीची मंजुरी मिळाली. त्यांनी ते साहित्य खरेदी करायचे आहे. त्याची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तो प्रस्ताव सादर करायचा आहे. ऑनलाइन त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.