हिंगोली जिल्ह्यात सलूनची जवळपास हजारांवर दुकाने आहेत. यात प्रत्येकी तीन धरले तरीही जवळपास तीन हजार कारागीर आहेत. खेडोपाडीही बलुतेदारीत अथवा सरळ घरोघर जाऊन व्यवसाय करणारेही वेगळे आहेत. सलून बंद म्हटले की, सर्वच ठिकाणच्या व्यवसायावर परिणाम होतो. ज्यांची दुकाने भाड्याची आहेत, आई, वडील, मुले, असे मोठे कुटुंब आहे, अशांवर उपासमार ओढवत आहे. शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च हे तर करणेच अवघड झाले. यापूर्वीही सात ते आठ महिने व्यवसाय ठप्प होता. आता पुन्हा तेच नशिबी आल्याने अनेकांना गावाकडे शेतात जाऊन राबण्याची वेळ येत आहे. अनेक दिवसांपासून हे काम करीत नसल्याने आता यातही फारशी मजुरी कोणी देत नाही, तर गुत्ते पद्धतीने कामे घेण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचेही काहींनी सांगितले, तर काही जण आता मोंढ्यात जाऊन हमालीच करावी की काय? असा सवाल करीत आहेत.
हिंगोलीत एकूण केशकर्तनालये १५०
त्यावर अवलंबून कामगार ४५०
एकतर आमच्याकडे सॅनिटायझर, साबणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, दुसरे म्हणजे आतापर्यंत सलूनमध्ये गेल्यावर बाधित झाल्याचे कुणी म्हटले नाही. आमच्या ९० टक्के समाजाची उपजीविका कर्तनालयावरच आहे. तरीही शासन कुठलीच मदत देत नाही. वारंवार आमच्याच मुळावर का उठताहेत, हे कळायला मार्ग नाही.
-अशोक गुळगुळे, जिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ
यापूर्वीही आमची दुकाने आठ ते दहा महिने बंद होती. आता कसाबसा कारभार रुळावर येत होता, तर पुन्हा नव्याने संकट आले. दुकान भाडे, शिक्षण, वैद्यकीय खर्च कसा करावा. घरसंसार कसा चालवायचा? एकतर परवानगी द्या; अन्यथा आम्हाला मदत जाहीर करा.
-गजानन मोरे, युवा जिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ
यापूर्वीच्या टाळेबंदीत दुकान भाडे न भरल्याने दुकान हातचे गेले. आता नवीन दुकान सुरू करण्याचा विचार करीत असतानाच पुन्हा बंदी आली. सध्या हळद काढणीच्या कामाला मजुरीवर जात आहे. असेच चालले तर मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चालाही हाती काही राहणार नाही.
-माउली कंठाळे, कारागीर
शासनाला गर्दीचे इतर सर्व उपक्रम चालतात. मात्र, आमच्या दुकानात एकावेळी एकाच ग्राहकाला प्रवेश असतो. शिवाय निर्जंतुकीकरणाच्या साहित्याशिवाय दाढी, कटिंग होत नाही. आम्ही मास्क घातलेला असतो. मग आमच्या व्यवसायाला बंदी घालून आम्हाला देशोधडीला का लावताय?
-बालाजी साखरे, कारागीर