औंढा नागनाथ येथे १९६५ मध्ये दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा व औंढा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी या ठिकाणी मोठे धरण बांधण्यात आले होते. कालांतराने या तलावाला औंढा नागनाथ तलाव असे नाव देण्यात आले. दहा वर्षे या तलावाचे काम पूर्ण होण्यासाठी लागले. १९७५ मध्ये हा तलाव पूर्ण झाला. या तलावावर ५९० हेक्टर क्षेत्र असून, प्रत्यक्ष ३२२ हेक्टर जमीन तलावाच्या पाण्याद्वारे सिंचनाखाली येत आहे.
या तलावातून औंढा नागनाथ शहराला अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जातो, तसेच मंदिरातही या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तलावाचे पाणी येथील नागनाथ उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आले असून, नौकाविहार करण्यासाठी या पाण्याचा उपयोग होत असतो. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने, सध्या हा तलाव शंभर टक्के भरला गेला आहे. आजमितीस तलावाच्या आजूबाजूला झाडेझुडपे व वेलींचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तलावाच्या पाळूला धोका पोहोचू शकतो. वेळोवेळी पाटबंधारे विभागाच्या विरष्ठांना याबाबत सांगण्यात आले, परंतु पाटबंधारे याकडे अद्याप तरी लक्ष दिलेले दिसत नाही. तलावाची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, परंतु हे कर्मचारी कोणत्याच प्रकारची देखभाल करत नाहीत, तसेच साफसफाईही करीत नाहीत.
तलावाच्या पाळूला झाडांनी वेढले असल्यामुळे ही झाडे तोडणे गरजेचे आहे.
पाटबंधारे विभागाने दगड-विटाच्या कामामध्ये ‘औंढा तलाव’ असे नाव कोरले होेते, परंतु वाढलेल्या झाडामुळे ते नाव दिसेना झाले आहे. ही झाडे पंधरा ते वीस फूट उंचीची झाली आहेत. झाडांची मूळ खोलवर गेली आहेत. भविष्यात ही झाडे तोडली गेली नाही, तर तलावाला धोका निर्माण होऊ शकतो. या तलावावरील झाडे तोडण्याची मागणी अनेक वेळा निसर्गप्रेमींनी केली आहे, परंतु या मागणीकडे अद्याप कोणीही लक्ष दिले नाही. या तलावातून नागेशवाडी, वगरवाडी, वगरवाडीतांडा, आसोलातर्फे, औंढानागनाथ, कोंसी बुद्रुक, जवळाबाजारकडील गावांना, तसेच पिकांना पाणी सोडले जाते. या तलावाचा मोठा आधार असल्याने, तलावाच्या ठिकाणी साफसफाई करून पाळूच्या आजूबाजूची झाडे तोडावीत, अशी मागणी होत आहे.
फोटो