हिंगोली जिल्ह्यात जवळपास २.३५ लाख हेक्टरवर सोयाबीन घेतले जाते. यासाठी २ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागते. त्यामुळे ऐनवेळी बाजारपेठेत शेतकरी बियाणांची शोधशोध करून हैराण होतात. त्यापेक्षा स्वत:कडील सोयाबीन बियाणे म्हणून वापरल्यास बियाणे खरेदीपासून सुटका होईल. कृषी विभागाने दिलेल्या विविध सूचना पाळून बियाणे साठवणूक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले.
काय घ्यावी काळजी?
शेतकऱ्यांनी ग्राम बीजोत्पादन पीक प्रात्यक्षिके व शेतकरी समूह इत्यादी कार्यक्रमांतर्गतचे उत्पादित बियाणे तसेच स्वत: उत्पादित सोयाबीन बियाणे म्हणून वापरावे. प्रमाणित बियाणांपासून उत्पादित चांगल्या प्रतिच्या बियाणांची चाळणी करून निवड करावी, सोयाबीन बियाणांचे बाह्य आवरण अत्यंत नाजूक व पातळ असल्याने त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे गरजेचे आहे. तर साठवणुकीपूर्वी दोन ते तीन दिवस उन्हात ताडपत्री अथवा सिमेंटच्या खळ्यावर अगदी पातळ पसरून वाळवावे. आर्द्रतेचे प्रमाण ९ ते १२ पर्यंत आणावे. यातील काडीकचरा, माती काढून स्वच्छ करावे व चांगल्या पोत्यात साठवून ठेवावे.
उगवणक्षमता तपासावी
सोयाबीण बियाणे साठवणूक करण्यापूर्वी घरगुती पद्धतीने त्याची उगवणक्षमता तपासावी व किमान ७० टक्के उगवण असेल तर बियाणे साठवणूक करावी. हे बियाणे आर्द्रता लवकर साठवून घेते त्यामुळे ओलविरहित व हवेशीर ठिकाणी साठवणूक करावी. प्लॅस्टिकऐवजी गोणपाटाच्या पोत्यात ठेवावे. पाचपेक्षा जास्त पोत्यांची थप्पी लावू नये, थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंटिमीटर उंचीवर लाकडी फळ्यावर करावी, पोत्यांची रचना आडव्या व उभ्या पद्धतीने करून हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार साठवणुकीच्या खोलीत कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. सोयाबीन वाहतूक करताना पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी.