हिंगोली : विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने राज्य शासन अनुदान देत असून, मागील दहा ते पंधरा वर्षांपासूनचा हा लढा अजूनही संपलेला नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. जे मिळाले त्याचे आम्ही हक्कदार आहोत, उर्वरित कधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ शाळा विनाअनुदानितवरून २० टक्क्यांवर आल्या आहेत तर २० शाळांना आता ४० टक्के अनुदान मिळणार? आहे. याशिवाय ४१ कनिष्ठ महाविद्यालयांनाही आता ४० टक्के अनुदान मिळणार? आहे. मार्च एंडपूर्वीच या सर्व शाळा, महाविद्यालयांच्या शिक्षकांची देयके सादर करण्यास सांगितले होते. ज्यांनी ही देयके सादर केली, त्या सर्वांना याचा लाभही मिळणार? आहे. शासनाने यासाठी अनुदानही उपलब्ध करून दिले आहे. अनेक शिक्षकांना मागील चार महिन्यांपासूनची फरकाची रक्कमही यात मिळणार? आहे. त्यामुळे शिक्षकांना आनंद झाला आहे. मात्र, अनेक शिक्षकांनी हा आमचा हक्क आहे. तत्कालिन सरकारने पहिला टप्पा तर दिला, मात्र पुन्हा दुर्लक्ष झाले. या सरकारने आता हा टप्पा दिला. त्यामुळे सरकारचे आभारही मानले. यामुळे शिक्षकांना आर्थिक स्थैर्य लाभल्यास त्याचा गुणवत्तावाढीसाठीही नक्कीच फायदा होईल, असेही सांगण्यात आले.
शासनाने अनुदान ४० टक्के केल्याच्या निर्णयाने आनंद झाला. यामुळे शिक्षकांना न्याय मिळाला. आता ते गुणवत्तावाढीकडे लक्ष देऊ शकतील. उर्वरितला असा विलंब होऊ नये, ही अपेक्षा आहे.
- गौतम भिसे, संस्थाचालक
यंदा अनुदानाचा एक टप्पा मिळाल्याने खुश आहोत. परंतु, प्रचलितनुसार सरसकट दिले असते तर शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टा थांबल्या असत्या. इतर क्षेत्रांना जसा निधी मिळतो, तसा शिक्षण क्षेत्राला मिळत नाही, याची खंत आहे.
- पंजाब गव्हाणकर, संस्थाचालक
हिंगोली जिल्ह्यातील ज्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी ज्यांनी प्रस्ताव सादर केले, त्या सर्वांची देयके सादर झाली. ती मंजूरही झाली आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने त्यांनी या जिल्ह्याकडे विशेष लक्ष वेधले होते. आता गुणवत्तावाढीचीही या शिक्षकांकडून अपेक्षा आहे.
- पी. बी. पावसे, शिक्षणाधिकारी
मी २०१०पासून कार्यरत आहे. आता अनुदान आले. मात्र, प्रचलितनुसार आतापर्यंत १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते. त्याचे आम्ही हक्कदार आहोत. प्रत्येकवेळी आंदोलन करून आम्हाला हक्क मिळवावा लागत आहे. या निर्णयामुळे आम्ही आनंदित आहोत. मात्र, पुढील टप्पेही आता वेळेत मिळाले पाहिजेत.
- अरविंद सावळे, शिक्षक
मागील १५ वर्षांपासून मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आता २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर अनुदान आले. त्याचा मनापासून आनंद झाला. मात्र, हे टप्पे एवढ्या विलंबाने दिले जात असल्याच्या वेदना होत आहेत. यापुढे हे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाला विनंती आहे.
- एम. एस. शेख, शिक्षक
अनेक वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा सुरू आहे. शासनाने पुढचा टप्पा दिल्याचा आनंद आहे. मात्र, त्याला मोठा विलंब झाला आहे. पुढच्या टप्प्याला असा विलंब होऊ नये, अशी अपेक्षा आहे.
- संतोष पतंगे, कर्मचारी