५ पथकांनी दिले कोंबड्यांना दयामरण
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : धांडे पिंपरी (खुर्द) येथे कोंबड्यांना बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या पाच पथकांच्या मदतीने गावातील १८७ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. खोल खड्ड्यात त्या गाडून टाकण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील धांडे पिंपरी येथे बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. परिसरात खळबळ माजली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये धांडे पिंपरी परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. एम. एन. आठवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावातील वेगवेगळ्या ठिकाणच्या १८७ कोंबड्यांना दयामरण दिले.
जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एल. एस. पवार, पशुसंवर्धन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान जावळे, सहआयुक्त डॉ. माधव आठवले ,पशुधन विकास अधिकारी डॉ. एन.जी.जाधव , डॉ. प्रणिता पेंडकर ,विस्तार अधिकारी वि. शि. पाईकराव, तलाठी एस. के. इंगळे, ग्रामसेवक ए. ए. वाडीकर यांच्यासह प्रत्येकी पाच सदस्यसंख्या असलेल्या एकूण पाच पथकांनी गावातील चार कुक्कुटपालन केंद्रात भेटून तेथील १८७ कोंबड्या नष्ट केल्याची माहिती डॉ. माधव आठवले यांनी दिली. प्रभाकर चव्हाण, माधवराव चव्हाण, पंडित धांडे ,बबन धांडे यांच्या कुक्कुटपालन केंद्रांवरील कोंबड्यांना दयामरण देण्यात आले. बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे पशुसंवर्धन विभागात कळाल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून गावात ७४६ कोंबड्या जिवंत स्वरूपात असल्याचे सर्वे केला होता. परंतु, प्रत्यक्षात दयामरण देताना मात्र केवळ १८७ कोंबड्याना दयामरण देण्यात आले आहे. या दोन आकड्यांमध्ये तफावतीचा ' खेळ ' काय आहे? हे काही उमजत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चौकट...
नमनालाच घडाभर तेल
धांडे पिंपरीत शंभर ते दीडशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा कोंबड्यांना दयामरण देण्यासाठी पोहोचला. परंतु, कोंबड्यांना मारल्यानंतर कुठे पुरायचे यासाठीची जागा निश्चित होत नव्हती. सात फूट लांबी आणि चौरस खड्डा करून त्यात कोंबड्यांना पुरायचे होते. परंतु गावात गायरान नसल्याने व कॅनॉल शेजारी खड्डा केला तर पाण्याचा पाझरा सुटत असल्याने निर्णय घेणे अवघड होऊन बसले. मृत कोंबड्यांना बाहेरगावी कुठेतरी गायरान जमिनीत गाडण्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला. तहसीलदारांशी पथकप्रमुख यांनी थेट संवाद साधला. परंतु, तहसीलदारांनी लेखी कळविण्याचे सूचवले. त्यानुसार मग कामठा फाटा ,कृष्णापूर, कांडली या गावाच्या गायरानमध्ये कोंबड्या गाडण्याची परवानगी मागणारे पत्रही देण्यात आले. दरम्यान, पशुधन सहायक आयुक्त पवार उपस्थित झाले. त्यांनी गावातील स्मशानभूमीजवळील जागेतच खड्डा खोदण्याचे आदेश दिले. जवळपास साडेअकरा ते दोन वाजेपर्यंत जागा निवडीसाठी घोळ घालण्यात आला. त्यामुळे बर्ड फ्लू झालेल्या गावात कोंबड्यांना दयामरण देण्याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच 'नमनालाच घडाभर तेल ' अशी परिस्थिती उद्भवली परिणामी सर्वांना ग्रामपंचायत परिसरातच ताटकळत बसावे लागले.