आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील धांडे पिंपरी (खुर्द) येथे कोंबड्यांना बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पाच पथकाच्या मदतीने गावातील १८७ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. खोल खड्ड्यात त्या गाडून टाकण्यात आल्या.
धांडे पिंपरी येथे बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये धांडे पिंपरी परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. एम. एन. आठवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावातील वेगवेगळ्या ठिकाणच्या १८७ कोंबड्यांना दयामरण दिले. या पथकात पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एल. एस. पवार, पशुसंवर्धन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान जावळे, डॉ. एन.जी.जाधव, डॉ. प्रणिता पेंडकर, विस्तार अधिकारी वि. शि. पाईकराव, तलाठी एस. के. इंगळे, ग्रामसेवक ए. ए. वाडीकर यांच्यासह प्रत्येकी पाच सदस्य संख्या असलेल्या सदस्यांचा समावेश होता. यावेळी प्रभाकर चव्हाण, माधवराव चव्हाण, पंडित धांडे, बबन धांडे यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्या नष्ट केल्याची माहिती डॉ. आठवले यांनी दिली. गावात ७४६ कोंबड्या जिवंत असल्याचे सर्व्हे करण्यात आला होता. दरम्यान, कोंबड्यांना मारल्यानंतर कुठे पुरायचे यासाठीची जागा निश्चित होत नव्हती. पथक प्रमुखांनी तहसीलदारांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी लेखी कळविण्याचे सुचवले. मात्र अखेर गावातील स्मशानभूमीजवळील जागेतच कोंबड्यांना खड्डा खोदून दयामरण देण्यात आले.
कृष्णापूर येथे १२३ कोंबड्यांचा मृत्यू; ९ची नोंद
कृष्णापूर येथील जितेंद्र कोंडबाराव पाईकराव याच्या घरी जवळपास शंभर ते सव्वाशे कोंबड्या पाळण्यात आल्या होत्या. तीन दिवसात त्याच्या ९३ कोंबड्या मरण पावल्या आहेत. परंतु पशुसंवर्धन विभागाच्या दप्तरी मात्र केवळ नऊ कोंबड्याच मरण पावल्याची नोंद आहे. गावात दुसऱ्या एका ठिकाणी ३० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. येथील मयत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल येणे अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अहवाल येण्यापूर्वीच कृष्णापूर येथील अनेक पशुपालकांनी आपल्या कोंबड्या रातोरात शेतामध्ये स्थलांतरित करणे सुरू केले आहे. दरम्यान, कृष्णापूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कुक्कुटपालन केंद्राच्या ठिकाणांवर निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात येत असल्याची माहिती सरपंच बबन खिल्लारे यांनी दिली.
सोबत फोटो २२एचएनएल २३