काचेवानी : वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.ग्रामीण व शहरी भागात सर्वाधिक वीज चोरी होते. दिवसासह रात्रीलासुद्धा वीज चोरी करण्यामध्ये बड्या लोकांचा अधिक वाटा आहे. गरीब आकडे लावून वीज चोरी करतात. वीज चोरी करणाऱ्यांची नावे त्या परिसरातील लाईनमन व कनिष्ठ अभियंत्यांना माहीत असते. मात्र चोरी करणाऱ्यांकडून महिनावारी रक्कम वसूल करून ते शांत राहतात. मात्र ज्यांच्याकडून वसुली होत नाही, त्यांना उपकार्यकारी अधिकारी किंवा भरारी पथकाच्या माध्यमाने फसविले जाते. शिवाय मोठ्या प्रमाणात बिलाची आकारणी करून धमक्या देवून पैसे उकळले जातात, असा नागरिकांचा आरोप आहे. २९ आॅक्टोबर रोजी गोंदियाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशनात व गंगाझरी शाखेंतर्गत येणाऱ्या काचेवानी येथे धाड घालण्यात आली. बरबसपुरा येथे माने परिवारावरही धाड घालण्यात आली. यावेळी लाईनमन व कनिष्ठ अभियंता यांनी केलेल्या चुकीची किंवा गुन्ह्याची नोंद तपासात घेतली नाही. कारवाईप्रसंगी बेरडीपारचे माजी सरपंच गणेश कोल्हटकर व अॅड. लंकेश चौरे माने कुटुंबीयांच्या घरी होते. मात्र भरारी पथकाने त्यांची साक्ष घेतली नाही. त्यामुळे भरारी पथकाने केलेला तपास योग्य नसून वीज कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या इशारावर करण्यात आल्याचा माने कुटुंबीयांचा आरोप आहे. माने कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार बरबरपुरा येथे गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे व कंत्राटी कर्मचारी यांनी गावातीलच धर्मराज चौधरी या युवकाला विद्युत खांबावर चढविले. यावेळी तो खांबावरून खाली आदळला. यावेळी कनिष्ठ अभियंता नसला तरी कंत्राटी कर्मचारी पाठविण्याची नैतिक जबाबदारी अभियंत्याची होती. याची पोलिसात तक्रार देण्यात आली नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या प्रकरणाची तक्रार होणार या भीतीने भरारी पथकाची धाड माने कुटुंबीयांवर घालण्यात आली. माने कुटुंबीयांनी जून २०१४ मध्ये नवीन घराची पूजा केली. त्यावेळी जीर्ण असलेल्या जुन्या घरातील मीटर नवीन घरी हलविण्याचे आदेश कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी लाईनमन बिसेनला दिले होते. लाईनमनने मीटर हलविले, मात्र खांबावरून सर्विस वायर काढला नाही. आपण पुन्हा येवून खांबावरून विद्युत प्रवाह बंद करून देवू, असे बोलून गेले. यावेळी पाहुणे मंडळी व बरबसपुरा येथील माजी ग्रा.पं. सदस्य माणिक कटरे उपस्थित होते. यानंतर झाडे कापण्याबद्दल व वीज प्रवाह बंद करण्याबद्दल कनिष्ठ अभियंता व लाईनमनला जून महिन्यापासून चार-पाच वेळा सांगण्यात आले. मात्र टलवाटलवी करून दुर्लक्षच करण्यात आले. विद्युत प्रवाह सुरू असलेला सर्व्हिस वायर कार्यरत कर्मचारी, लाईनमन, कंत्राटी कर्मचारी व कनिष्ठ अभियंत्याने तपासून का घेतले नाही? हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असे माने कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर करते भरारी पथक काम
By admin | Updated: November 24, 2014 23:00 IST