उषा शहारे : आरक्षणामुळे महिलांना राजकारणात महत्त्वाचे स्थान देवरी : ठिकठिकाणी महिला मेळावे घेतले जातात. या मेळाव्यात उपस्थित महिलांना आजही पाहिजे ते वैवाहिक, शैक्षणिक, आर्थिक व भावनिक स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही. शिक्षण घेवून प्रगती करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे. आज आपल्या देशात ५० टक्के महिलांना आरक्षणामुळे राजकारणात खूप महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. महिलांचे संख्याबळ वाढून काही महिला राजकारणामुळे मोठमोठ्या पदावर आरुढ झाल्या आहेत. या अधिकाराची जाण ठेवून त्यांनी आपल्या गावाचा, क्षेत्राचा व जिल्ह्याचा विकास करावा. महिलांच्या प्रगतीमुळे समाजाची उन्नती होत असते, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य उषा शहारे यांनी केले. देवरी तालुका महिला काँग्रेसच्या वतीने चिचगड येथे बिरसा भवनात गुरूवार (दि.९) घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. उद्घाटन जि.प.सदस्य माधुरी कुंभरे यांच्या हस्ते, जि.प. सदस्य उषा शहारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दीप प्रज्वलन माजी जि.प. सदस्य मीना राऊत यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सदस्य लखनी सलामे, तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्ष तुकाय ताराम, सामाजिक कार्यकर्ता उषा भैसारे, निलजच्या रेखा घरत, पिपरखारीच्या सरपंच जसवंता भारद्वाज, मोहाडीच्या मोनाली राऊत, तिरुवंता राऊत, बचत गटाच्या अध्यक्ष धनश्री गंगासागर, वनहक्क समितीच्या अध्यक्ष किरण कोवे, डोंगरगाव बचत गटच्या अध्यक्ष भोयर, पिपरखारीच्या अंबादे, कोटजांभोराच्या राऊत, भागी येथील कोरोडे, आलेवाडाचे ग्रा.पं. सदस्य शांता कोराम, शीला चंदनमलागर, माजी सरपंच पायताजन शाहू यांच्यासह तालुक्यातील महिला काँग्रेसच्या पदाधिकाारी व कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात जि.प. सदस्य उषा शहारे पुढे म्हणाल्या, आज महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व व्यावसायिक सबळता येत आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजना आणि शासकीय विविध योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांचे आरोग्य जपण्याचे व सबलीकरणाचे काम सुरू आहे. या योजनांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अंधश्रद्धेबाबत त्या म्हणाल्या, महिलांच्या बाबतीत बऱ्याचदा असे दिसून येते की महिलांच्या मानगुटीवर अंधश्रध्देचे भूत बसलेले आहे. या अंधश्रध्देतून बाहेर पडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, जर समाजाची व देशाची प्रगती करायची असेल तर आधी महिलांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे, असेही उषा शहारे यांनी सांगितले. प्रास्ताविक व संचालन तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा घरतकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रगती कोल्हारे यांनी मानले. (प्रतिनिधी)
‘महिलांची प्रगती, समाजाची उन्नती’
By admin | Updated: March 13, 2017 00:28 IST