गोरेगाव : कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, मागील वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी शेतकरी शेतात राबराब राबला व धानाचे उत्पन्न घेतले पण त्याचे धान प्रशासनाच्या नाकर्तेणामुळे आज बांधांवरच आहे. अशात रब्बीचा धान विकायचा कोणाला? अशा प्रश्न थील युवा शेतकरी राहुल चोपलाल येळे यांनी उपस्थित केला आहे.
सध्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी बंद आहे. दलाल पडक्या किमतीत धानाचा हिशोब लावत आहे. अशावेळी शेतकऱ्याने काय करावे असा प्रश्न येळे यांनी उपस्थित केला आहे.
खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्यामुळे यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात पीक पडून आहे मात्र ते घेणारे कुणी नाही. कोरोनाच्या संकटासोबतच शेतकरी वर्गाला अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरापासून निसर्गाचे दुष्टचक्र सुरू आहे. तुफान वादळवारासह पाऊस हजेरी लावत आहे. तेव्हा मायबाप सरकारने काहीतरी करावे, अशी आर्त हाक येळे यांनी लावली आहे.