देवरी : तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी ग्रामपंचातचा सरंपच कोण? हा संतप्त प्रश्न गावकरी व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी खंडविकास अधिकारी एस.एन. मेश्राम यांना विचारला आहे. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधार्थ खंडविकास अधिकारी मागील दोन दिवसांपासून कार्यालयात आलेच नाहीत.सविस्तर असे की, देवरीचे सरपंच संतोष मडावी यांच्या विरोधात १२ विरुद्ध एक सदस्यांनी ८ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव पारीत केला होता. १२ आॅगस्ट रोजी खंडविकास अधिकारी मेश्राम यांनी देवरीचे उपसरपंच कृष्णदास चोपकर यांना अधिकृत पत्र देऊन प्रभारी सरपंच म्हणून नियुक्त केले होते. १३ आॅगस्ट रोजी मडावी यांनी अविश्वासा विरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता व त्याला २६ आॅगस्ट रोजी मंजूर करण्यात आले. मंजूर अर्जाचा आदेश नियमानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार व त्यांच्याकडून खंविअ मेश्राम यांच्याकडे पाठवायला पाहिजे होता. परंतु तशी प्रक्रिया न झाल्याने खंविअ मेश्राम यांनी २६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर पर्यंत प्रभारी सरपंच चोपकर यांचे पद रिक्त करून मडावी यांना सरपंच पद देण्याचे कोणतेही आदेश काढले नाही.तर ३१ आॅक्टोबर रोजी प्रभारी सरपंचांनी अप्पर जिल्हाधिकारी यांनी अविश्वासाच्या विरोधात मंजूर केलेल्या अर्जाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट पीटीशन दाखल करुन आवाहन केले. यावर उच्च न्यायालयाचे १४ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत देवरीची जशी परिस्थिती होती तशी असू द्या म्हणून स्टेटेस्को दिला. त्यामुळे सरपंच पदाचा प्रभार चोपकर यांच्याकडेच होता व आहे.दरम्यामन विस्तार अधिकारी के.ए. आचले यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश नसून सुद्धा ८ आॅक्टोबर रोजी पंचायत समितीच्या आवक जावक मध्ये मागील ४ आॅक्टोबर असा दिनांक टाकून खंड विकास अधिकारी यांना मडावी यांना रुजू करीत असल्याचे पत्र दिल्याचा व आपल्या पदाचे दुरुपयोग केल्याचा आरोप १२ सदस्यांनी लावला आहे. तसेच तेव्हापासून आचले व मडावी हे ग्रामपंचायत मध्ये कराच्या रुपाने जमा होणारा पैसा बँक अकाँउट मध्ये न टाकता व ग्रामपंचायत कमेटीची मंजूरी न घेता परस्पररित्या नियमबाह्य खर्च करीत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे.मुख्य म्हणजे मागील चार महिन्यांपासून वाऱ्यावर असलेल्या ग्रामपंचायतचा सरपंच कोण हा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत १४ नोव्हेंबर रोजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम व जिल्हा परिषद सदस्य राजेश चांदेवार यांनी उपस्थित केला होता. यावर खंडविकास अधिकारी मेश्राम यांनी २४ तासांत निर्णय देण्याचे आश्वासन सभेत दिले होते. त्या अनुषंगाने १२ सदस्यांनी भाजपा तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वात खंड विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी सुद्धा वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सांगतो, हेच उत्तर खंड विकास अधिकारी मागील दोन महिन्यांपासून देत असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. त्यावेळी तहसीलदारांसमोर बीडीओंंनी २० नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पर्यंत निर्णय देण्याचे आश्वासन दिले. परंतु दि. २७ नोव्हेंबरपासून खंडविकास अधिकारी लापता आहेत. न्याय मागणाऱ्यांनी दिवसभर दुरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतचा सरपंच कोण?
By admin | Updated: November 29, 2014 23:23 IST