केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेल्या सन २०२०-२१ च्या खरीप हंगामातील प्रलंबित बोनस रक्कम फक्त ५० टक्के प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या रकमेमधून सुरू असलेल्या सन २०२१-२२ या वर्षाच्या खरीप हंगामाचा खर्च भागविणे कठीण झाल्याने उर्वरित ५० टक्के बोनस रक्कम केव्हा मिळणार, असा सवाल केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा या आधारभूत धान खरेदी केंद्रामधून आदिवासी विकास महामंडळाने सन २०२१-२१ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादित धान खरेदी केली होती. एक वर्षाचा कालावधी लोटूनही शासनाने मंजूर केलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस रक्कम प्रलंबित आहे. बोनस रक्कम न मिळाल्यामुळे सन २०२१-२२ ला खरीप हंगामाचा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. खा. प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकाराने ५० टक्के बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आली. परंतु सध्या खरिपातील धान रोवणी आटोपत आली आहे. मजुरांची मजुरी आणि खत विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासून आदिवासी महामंडळाने खरेदी केलेल्या धानाचा प्रलंबित असलेला ५० टक्के बोनसची रक्कम शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांसह दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे.