लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या धानाला युरिया खताची अत्यंत आवश्यकता असून ते जर वेळेवर मिळाले नाही तर ऐन बहरात आलेले धान पीक मातीमोल होण्याची शक्यता आहे. हीच संधी साधून खत व्यापाऱ्यांनी कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा निर्माण करून काळा बाजार मांडला आहे. युरिया खताचा काळा बाजार करणाऱ्यांना बेड्या ठोका अशी मागणी तालुक्यातील ग्राम ढाकणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितम मेश्राम यांनी केली आहे.आपला जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. या धान शेतीवरच येथील शेतकऱ्यांचे जीवन आहे. सध्या धान शेतीला करपा रोगाने ग्रासले असून त्याचे निदान म्हणून युरिया खताची आवश्यकता आहे. ते खरेदीसाठी शेतकरी एकच धावपळ करीत आहेत. हीच संधी साधून खत व्यापारी कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा दाखवून २७० रुपयांची पोती सरळ ५०० रुपयाला विक्री करीत आहेत. ही सर्व माहिती कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाला सुद्धा आहे. खताच्या होणाऱ्या काळ्याबाजारवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाकडून भरारी पथकसुद्धा बनविण्यात आले आहेत. परंतु आजपर्यंत या पथकांनी खत व्यापाऱ्यांना फक्त नोटिसाच दिल्या असून ठोक स्वरूपाची कारवाई केली नाही. त्यामुळे कृषी विभाग हा शेतकरी हिताचा की खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हिताचा असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. युरिया खताची कोणतीही टंचाही नाही असे कृषी विभागाचे म्हणणे आहे तर मग युरियाचा तुटवडा कसा? असा प्रश्न पडत आहे. खताचा काळाबाजार मांडणाऱ्या खत व्यापाऱ्यांवर देशद्रोह कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ बेड्या ठोकाव्यात. तसेच या काळाबाजार प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.
युरियाच्या टंचाईसाठी जिल्हा प्रशासन जबाबदार- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना युरिया खतासाठी वणवण भटकावे लागत असून, चढ्या दराने खरेदी करावे लागत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला आहे; मात्र मागील काही दिवसांपासून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी मिळेल ते दाम देऊन युरिया खत खरेदी करण्यासाठी भटकत आहे. ३०० रुपयाला मिळणारी बॅग सध्या ५०० रुपये देऊनही शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. गोरेगाव तालुक्यातील अनेक कृषी केंद्र संचालक ५०० रुपये घेऊन खत विक्री करीत आहेत; मात्र प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करून कृषी विभागाला धारेवर धरत शेतकऱ्यांना योग्य दरात कसे युरिया खत उपलब्ध करून देण्यात येईल यासंदर्भात नियोजन करावे, अशी मागणी कटरे यांनी केली आहे.