गोंदिया : राज्यात दर २ वर्षानंतर काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९४ गावांची निवड करण्यात आली असून ही संकल्पना राबविण्यासाठी १०० कोटींचा अपेक्षीत खर्च आहे.एकंदर पाणी टंचाईचा हा प्रश्न दरवर्षी गंभीर होत चालला आहे. पाण्याची पातळी २ मीटरने खाली गेली आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे आतापर्यंत पाणी पुरले. मात्र वर्तमान स्थितीत पाण्याचे नियोजन करण्यात आले नाही तर येणारी पिढी पाण्यापासून वंचित राहणार यात शंका नाही. नेमक ी हीच बाब हेरून राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी उपलब्ध असावे या उद्देशातून हे अभियान राबविले जात असून जिल्ह्यात त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांत कामांना सुरूवात करण्यात आली असून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडूनही कामे केली जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने १२ कोटी ७६ लाख रूपयांची २०७ कामे घेतली आहेत. यातील १५ कामे पूर्ण केली असून त्यावर १ कोटी ६८ लाख रूपयांचा खर्च केला आहे. तर ११ कामे सुरू आहेत. (शहर प्रतिनिधी)
१०० कोटीतून होणार ९४ गावे जलयुक्त
By admin | Updated: April 25, 2015 01:04 IST