गोंदिया : आठवडी बाजारात आपण एखादी वस्त खरेदी करतांना भाव केला तर नकळत आपली नगदी जादुई पध्दतीने फसगत केली जाते. यातून आपल्याला पैसे बचतीचा आनंद मिळत असला तरी अशा भावबाजीच्या खरेदीतून आपलीच फसगत झालेली असते. कारण बाजीराव दांडी मारणे, वजन कमी देणे, वस्तुरूप वजन पारड्यात ठेवणे यासारखी कृत्य सर्रास सुरू असते. तसेच असा प्रकार तालुक्यातील आठवडी बाजारातही सुरू असल्याची नागरिकांत चर्चा आहे. गोंदिया शहरात मोठी बाजारात पेठ आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे या बाजारात खरेदीसाठी आजूबाजूच्या परिसरातील तसेच लगतच्या गावातील नागरिक दररोज ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. तसेच मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे किरकोळ व्यापारी माल विक्रीसाठी ठेवतात. तसेच गोंदिया तालुक्यातील विक्रेते आपल्याकडील माल, भाजीपाला घेऊन या ठिकाणी येतात. विक्रेत्यांनी ते वापरत असलेली वजन दर दोन-दोन वर्षानी प्रमाणित करणे बंधनकारक असूनही अनेक विक्रेते नेहमीप्रमाणे प्रामाणिक करीत नाहीत. तसेच त्यासाठी त्यांची प्रशासनाकडून चौकशी होत नाही. एखाद्या वेळी कुणी आलेच तर वजनाचे प्रमाणित करण्यापेक्षा हात ओले करण्यावरच अधिकाऱ्यांचा जास्त भर असतो. त्यामुळे विक्रेतेही हात ओले करून मोकळे होतात. गेल्या अनेक वर्षापासून तेचतेच वजनमापे वापरून जीर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांची झीज होऊन त्यांचे वजनही कमी झाले आहेत. परिणामी कमी मापाची वस्तू ग्राहकांच्या माथी मारले जाते. त्यामुळे ग्राहक एक किलोचे जरी पैसे देत असला तरी त्याला एका किलोपेक्षा कमी वस्तू मिळते. (तालुका प्रतिनिधी)