अंकुश गुंडावार
गोंदिया : २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांत १३ लाख ५६ हजार ३५४ लोकसंख्या आहे. यापैकी २ लाख २३ हजार ३४३ रेशन कार्डधारकांना शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत दर महिन्याला स्वस्त धान्याचे वाटप केले जाते. जवळपास १२ लाख नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. यात अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांचा समावेश आहे.
अंत्याेदय गटातील लाभार्थी हे दारिद्र्यरेषेखालील असून, ७८ हजार ४६१ रेशन कार्डधारकांच्या परिवारातील ३ लाख २६ हजार ९१ लाभार्थी आहेत. शासनाच्या निकषानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांच्या खाली आहे. त्यांना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी असे संबाेधले जाते; परंतु आता प्रत्येकाच्या घरात टीव्ही, फ्रीज, मोटारसायकल यासारख्या महागड्या वस्तू असतानाही ते दारिद्र्यरेषेखालील असल्याचे दाखवून मोफत स्वस्त धान्याकरिता दुकानात रांगा लावत असल्याचे चित्र आहे. आश्चर्याची बाब अशी की, दुमजली इमारत आणि स्वत:ची चारचाकी असणाऱ्यांचासुद्धा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश आहे. मात्र, या योजनेचे खरे लाभार्थी मात्र या योजनेपासून वंचित राहत आहेत. नवीन आर्थिक सर्वेक्षण व्हायचे असले तरी नागरिकांनी स्वस्त:हून शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
....................
कोणत्या तालुक्यात किती दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
तिरोडा : १०१५७
सालेकसा : ७३३१
आमगाव : ८४१०
अर्जुनी मोरगाव : १०८१७
देवरी : ८४६९
गोंदिया : १४९३०
गोरेगाव : ९४९०
सडक अर्जुनी : ८२७७
.........................
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या : १३ लाख ५६ हजार ३५४ : एकूण रेशनकार्डधारक : २ लाख २३ हजार ३४३, दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक ७८४६१.
..........................
दारिद्र्यरेषेसाठी निकष काय?
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे सर्वेक्षण करून द्रारिद्र्यरेषेसाठीचे निकष ठरविले जातात. त्यांच्या १९९७ च्या सर्वेक्षणातील निकषानुसार काढलेल्या शासन आदेशाने सार्वजनिक वितरणव्यवस्थेद्वारे पिवळे रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहे.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशांचा दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी म्हणून उल्लेख केला जातो.
- दरम्यानच्या काळात ज्यांचे उत्पन्न वाढले त्यांचा पिवळ्या कार्डमधून केशरी कार्डमध्ये समावेश करण्यात आला. त्यांना प्राधान्य गटातील लाभार्थी म्हटले जाते.
..................
कोट :
जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील आणि प्राधान्य गटातील कुटुंबांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच या लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. सन २०१४ पासून अन्न सुरक्षा कायदा अमलात आणल्यामुळे दारिद्र्यरेषेखालील ही संकल्पना बंद करण्यात आली असून, त्यांचा अंत्योदय गटात समावेश करण्यात आला आहे. त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ दिला जातो.
-डी.एस. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
..................
दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला जात नाही
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात बरेच जण वार्षिक उत्पन्न कमी दाखवून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शेतीचे तुकडे करून अथवा शेतकरी असतानासुद्धा शेतमजूर असल्याचे दाखवून कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र तयार करून स्वस्त धान्याची उचल करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, याचा वेळोवळी आढावा घेतला जात नसल्याने योग्य लाभार्थी यापासून वंचित आहेत.
..............
कोण गरीब, कोण श्रीमंत : २ लाख २३ हजार ४४३ कार्डधारकांना मोफत धान्य
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदळाचे मोफत वितरण केले, तर राज्य शासनानेसुद्धा काही महिन्यासाठी मोफत धान्याचे वितरण केले. याचा जिल्ह्यातील ७८४६१ अंत्योदय गटातील कार्डधारक आणि १४८८२० प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना लाभ देण्यात आला. याचा दोन्ही गटांतील एकूण २ लाख २३ हजार ४४३ रेशन कार्डधारकांच्या १२ लाख नागरिकांना मोफत अन्यधान्याचा लाभ देण्यात आला.