सर्व सुविधा उपलब्ध : भेदभावपूर्ण निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये असंतोषगोंदिया : राज्य सरकारने विदर्भातील काही शहरांमधील विमानतळांचा विकास करण्याची आणि तेथे नागरी विमान वाहतुकीच्या दृष्टीने तयारी करण्याची घोषणा केली. मात्र सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असणाऱ्या गोंदिया येथील बिरसी विमानतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे गोंदियावासीयांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात गोंदियावासीयांच्या सुविधेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. सरकारचे हे पाऊल भेदभावपूर्ण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार ३५० कोटी रुपये खर्च करून यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला येथील विमानतळांचा विकास करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तेथून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यात चंद्रपूर-अमरावती-पुणे-मुंबई, दुसरी सेवा चंद्रपूर-अकोला-अमरावती-मुंबई आणि तिसरी विमानसेवा चंद्रपूर-यवतमाळ-अमरावती-पुणे-मुंबई या तीन मार्गांवर करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र त्यात गोंदियाला वगळण्यात आले. वास्तविक राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्याला राज्याच्या राजधानीसह इतर ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा गरजेची झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे. सोमवारी आणि बुधवारी मुंबईतील कॅनिबनेट मीटिंगनिमित्त अनेक लोक मुंबईच्या दिशेने धाव घेतात. त्यामुळे या दोन दिवसाकरिता गोंदियातून मुंबईकरिता विमानसेवा देण्याची मागणी होत आहे. तसेच लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधूनही हवाई यात्री गोंदियात येऊ-जाऊ शकतात.बिरसी विमानतळ हे मध्यप्रदेशातील कान्हा किसली या वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सर्वात जवळचे विमानतळ ठरणार आहे. प्रिंस चार्ल्स, स्व.धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपतींचे विमान येथील विमानतळावर आतापर्यंत उतरले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
बिरसी विमानतळाकडे सरकारने फिरविली पाठ
By admin | Updated: October 16, 2015 02:39 IST