शिक्षण सभापतींना निवेदन : मिसपिर्री, धमदीटोला व इस्तारी परिसरात शिक्षकांची मागणी देवरी : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील मिसपिर्री, धमदीटोला व इस्तारी येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरा, अशी मागणी तिन्ही गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात त्यांनी जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी. कटरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एल.आर. पुराम आणि शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना निवेदन सदर केले. शिक्षकांच्या संबंधात मागणी पूर्ण न झाल्यास २५ जुलै रोजी सदर तिन्ही शाळेला लावण्याचा इशाराही या निवेदनातून दिला आहे. सविस्तर असे की, शासनाकडून आदिवासी दुर्गम गावातील लहान मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवून त्यांना चांगले ज्ञानार्जन व्हावे या उद्देशाने जि.प.च्या माध्यमातून शाळा उघडण्यात आल्या. परंतु नियमाप्रमाणे २० विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची पूर्तता करण्याचे नियम शासनाने ठरवून दिल्यानंतरही देवरीच्या शिक्षण विभागाकडून या नियमाचे पालन योग्यरित्या होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. देवरी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करुन शिक्षकांच्या पूर्ततेची मागणी करण्यात आली होती. १७ जुलैपर्यंत आमची मागणी पूर्ण न झाल्यास १८ जुलै रोजी आम्ही तिन्ही शाळांना बंद करणार असा इशारा ही निवेदनातून दिला होता. परंतु देवरीच्या शिक्षण विभागाने त्यांच्या मागणीच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली. निवेदनकर्त्यांच्या मते मिसपिर्री येथे पटसंख्येप्रमाणे तीन शिक्षक आहेत. परंतु मुख्याध्यापक बी.डी. मेश्राम हे नियमित शाळेत राहात नाही. दुसरे शिक्षक सी.एस. मेंढे यांना मिसपिर्री व चिचगड केंद्राचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांचा पूर्ण वेळ हा केंद्राच्या कामात जातो. तिसरे एकच शिक्षक वर्ग १ ते ७ च्या विद्यार्थ्यांना कसे शिकवणार? तसेच धमदीटोला येथील विद्यार्थ्यांची पटसंख्या ७२ असून येथे चार शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु तीनच शिक्षक येथे कार्यरत आहेत. आणखी एकाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे इस्तारी येथील शाळेत पटसंख्या ७३ असून येथे चार शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु येथे दोनच शिक्षक कार्यरत आहे. आणि वरुन शिक्षकांकडे शासकीय कामे व कार्यशाळेत व्यस्ततेमुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. प्राथमिक शिक्षक म्हणजे शैक्षणिक जीवनातील पायवा असतो. शासनकर्ते एकीकडे गावची शाळा आमची शाळा हा प्रयोग राबवित आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळेत शिक्षकांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे शिक्षणाची दयनीय अवस्था झाली आहे. याच कारणाने ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक स्पर्धेत टिकत नाही. शासनकर्त्यांनी सदर तिन्ही शाळेत शिक्षकांची त्वरित पूर्तता करावी, या संदर्भात एक निवेदन गोंदिया जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी. कटरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एल.आर. पुराम आणि शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना सादर केले. यावेळी मिसपिर्रीचे सरपंच दुर्गेश कुंभरे, उपसरपंच जीवन सलामे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन सयाम, उपाध्यक्ष चतूर मडावी, ग्रा.पं. सदस्य गणेश दर्रो, अनिल भोगारे, धमदीटोलाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनशाम मडावी, पालक मिथलेश चव्हाण आणि इस्तारीचे सरपंच राजकुमार अडबैया, उपसरपंच प्रेम सिंद्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे दिलीप अंबरखोड, ग्रा.पं. सदस्य महेश बन्सोड, शामराव कुमेटी, गावकरी, पालक रामजी सहळी, प्रल्हाद कोरेटी, दिलीप कोमार, महताखेडाचे ग्रा.पं. सदस्य बाबुराव हिडको आणि कडीकसाचे ग्रा.पं. सदस्य बलवंत बंजार यांच्या शिष्टमंडळाद्वारे सादर करुन शिक्षक पूर्ततेची मागणी केली. सदर मागणी पूर्ण न झाल्यास २५ जुलै रोजी सदर तिन्ही शाळेत ग्रा.पं.चे पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावकरी पालकवर्ग मिळून शाळेला कुलूप लावणार असा इशाराही या निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
आदिवासी पट्ट्यात शिक्षकांची वाणवा
By admin | Updated: July 25, 2016 00:23 IST