गोंदिया : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाशी लढा देत असताना उपचारात्मक उपाययोजना कमी पडत आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात औषध,रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर आदींचा तुटवडा भासत असल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडत आहे. यामुळे राज्य शासनाने पर्याप्त प्रमाणात उपाययोजनात्मक औषध व साहित्यांचा पुरवठा करण्याची मागणी खा. प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णांमुळे शासकीय व खासगी रुग्णालयावरील ताण वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे व आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. गोंदिया जिल्ह्यातील रुग्णालयात व तालुक्यातील रुग्णालयात औषध, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेसह रुग्णांची तारांबळ उडत आहे. यासाठी राज्य शासनाकडून त्वरित उपाययोजना करून औषध व इतर साहित्याचा पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात यावे, या मागणीचे निवेदन खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले आहे.