गोरेगाव : दि.२७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने सटवा, डव्वा, गणखैरा, तुमखेडा या गावांना झोडपून काढले. हजारो घरांच्या छतावरील टिनपत्रे, कवेलू पूर्णत: उडाली. रबी पिकाला प्रचंड फटका बसला. हजारो झाडे उन्मडून पडली. शेतकऱ्यांच्या लाखोंचे नुकसान झाले व ते आर्थिक संकटात सापडले.विजेची तारे रस्त्यावर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. सटवा येथे चक्रीवादळाने तब्बल २०० च्या वर घरातील टीनपत्र व कवेलू शेकडो मीटर दूर उडून गेली. घटना रात्रीला घडल्याने प्राणहानी झाली नाही, पण जनावरांना इजा झाली. शाळेच्या टाकीवरील पाणी टाकी उडून गेली. डव्वा येथे विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. प्रचंड वित्तहानी झाली. मागील पाच दशकांपूर्वीपासून असा चक्रीवादळ आपल्या जीवनात कधीही पाहिले नसल्याचे गावातील वृद्धांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस पाटील व सरपंच यांच्या सूचनेनुसार, तलाठी चौधरी यांनी घटनेचा पंचनामा केला. परिसरातील नुकसान पाहता काही लोकप्रतिनिधींनी तहसीलदार डहाट यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. राष्ट्रवादीच्या वतीने २९ एप्रिल रोजीच्या मोर्च्यात चक्रीवादळ ग्रस्तांना मदत देण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात पोलीस पाटील, सरपंच यांच्या मदतीने नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्यात येत असला तरी त्यांना आर्थिक मदत केव्हा मिळणार, असा सवाल नुकसानग्रस्तांनी उपस्थित केला आहे. नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी सटवाचे सरपंच रमेश ठाकूर, डव्वाचे सरपंच जगदीश बोपचे, गणखैराचे सरपंच के.टी. राऊत, भागचंद्र रहांगडाले, माजी पं.स. सदस्य युवराज रहांगडाले आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवकाळी पावसाने झोडपले
By admin | Updated: April 30, 2016 01:46 IST