६५५३ क्विंटल धान खरेदी : अकाली पावसाने उडविली तारांबळ देवरी : येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून यंदा सहा हजार ५५३ क्वींटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेड अभावी खरेदी करण्यात आलेले धान उघड्यावरच पडलेले आहे. अशात मागील दोन दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसामुळे धान ओले होत असून त्यावर ताडपत्री घालून वाचविण्याची धडपड केली जात असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादीत धानाला निश्चित हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धानाची खरेदी केली जाते. यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत दोन लाख ३१ हजार ८८६.८१ क्विंटल धान खरेदी केले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असला तरी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. शेतकऱ्यांच्या उत्पादीत धानाला योग्य प्रमाणात भाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यात यावी, यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्यामाध्यमातून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्यावतीने जिल्ह्यात ४० धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सहा हजार ५५३ क्वींटल धान खरेदी केली आहे. गोडाऊन अभावी खरेदी करण्यात आलेले हे धान उघड्यावर पडून आहे. त्यात मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून उघड्यावर पडून असलेले हे धान पावसात ओले होत आहे. अशात या धानाला वाचविण्यासाठी त्यावर ताडपत्री टाकून वाचविण्याची धडपड केली जात आहे. पावसाचा फटका खरेदी केंद्रावरील धानाला बसत आहे. याशिवाय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेले धानही पावसाच्या तावडीत आले आहे. संस्थेकडे ताडपत्री उपलब्ध असली तरी खरेदी केलेल्या धानावरच ती आच्छादीत केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल धान पाण्याने भिजले आहेत. (प्रतिनिधी)
धान वाचविण्याची धडपड
By admin | Updated: January 4, 2015 23:16 IST