केशोरी/नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या केशोरीसह परिसरातील गावांना १८ रोजी सायंकाळी ५ वाजता चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात झाडे उन्मळून पडली. काही घराचे टिन, छत उडाल्यामुळे घरांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे या परिसरातील घराचे टिन छत उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. केळवद येथील एका महिलेच्या हातावर झाडाची फांदी पडून हात तुटला तर आंभोरा येथे वीज पडून नत्थू देवसाय कोवाची यांचा जागीच मृत्यू झाला. तो आई-वडीलांना एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घराचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तालुका शिवसेना प्रमुख चेतन दहीकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
केशोरीसह परिसरात वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 01:31 IST