लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : धान पिकातील कचरा होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांने तणनाशकाची खरेदी करुन फवारणी केली. मात्र यामुळे धानातील कचरा नष्ट होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १० एकरातील धानपीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे सदर तणनाशक औषधी तयार करणाऱ्यां कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील शेतकरी देवराम कोठुजी अंबुले यांनी आपल्या १० एकर शेतीत धान पिकाची लागवड केली. रोवणी केल्यानंतर शेतात तण कचरा होऊ नये यासाठी शेतात तणनाशक औषधीची फवारणी केली. देवराम अंबुले यांनी गावातीलच अंबुले कृषी केंद्रातून टुफोर्टी-नामिनी गोल्ड तणनाशक मागीतले असता त्यांनी त्याला अॅसर्ट कंपनीचे तणनाशक दिले.अंबुले यांनी शेतात जाऊन या तणनाशकाची फवारणी केली.आठ दिवस, पंधरा दिवस, महिना लोटला पण शेतातील तण नष्ट झाले नाही. तर धान नष्ट होण्यास सुरूवात झाली. तण वाढल्याने धानपिक दबले गेले व संपूर्ण शेतात धानाऐवजी तण मोठ्या प्रमाणात वाढले.शेतकऱ्याने कृषी केंद्र संचालकांना असर्ट तणनाशकामुळे फायदा न होता नुकसान झाल्याचे सांगितले. पण कृषी केंद्र संचालकांनी यावर कसलेच उत्तर न देता शेतकऱ्याला परतावून लावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता देवराम अंबुले यांनी या संपूर्ण प्रकाराची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांच्याकडे रितसर तक्रार केली.मात्र अद्यापही याची चौकशी करण्यात आली नाही. गट क्र.२६१, २५९, २५६, आराजी ३.२८ हेक्टर कोदू अंबुले, नंदराम अंबुले व १४५, ४५२/१, ४२१/२ देवराम अंबुले आराजी १ हेक्टर एकूण चार हेक्टर जमिनीत या तणनाशकाची फवारणी केली. त्यांचा लागवड खर्च, बियाणे, खत यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च कृषी केंद्र संचालकाच्या चुकीमुळे व्यर्थ गेला.हाती आलेले पीक सुध्दा वाया गेल्याने बँकेच्या कर्जाची परफेड कुठून करायची, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा असा गंभीर प्रश्न अंबुले यांच्यासमोर निर्माण झाला असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
तणनाशक फवारणीने कचरा नष्ट होण्याऐवजी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST
मात्र यामुळे धानातील कचरा नष्ट होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १० एकरातील धानपीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सदर तणनाशक औषधी तयार करणाऱ्यां कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तणनाशक फवारणीने कचरा नष्ट होण्याऐवजी वाढला
ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : औषध निर्माण कंपनीवर कारवाईची मागणी