भाकप व लालबावटा संघटनेचा मोर्चा : एसडीओंना दिले निवेदन देवरी : भारतीय कम्युनिष्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन गुरूवारी उप विभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. क्रांतिकारी शहीद भगतसिंग कामगार भवनातून राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले व लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्य सचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीतून बेदखल करने बंद करा, निराधारांना तीन हजार रुपये मदत द्या, निराधारांसाठी योजना नको कायदा करा, अतिक्रमण करणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या, सर्वांना रेशन दुकानातून ३५ किलो धान्य २ रुपये प्रति किलो दराने वाटप करा यासह वनरक्षक बारसेला निलंबीत करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावर उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी कार्यालया बाहेर प्रांगणात येऊन मोर्च्याचा प्रतिनिधी मंडळाच्यावतीने निवेदन स्वीकारुन त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या मागण्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. पश्चात राणी दुर्गावती चौकात बाबूराव राऊत यांच्या अध्यक्षतेत जाहीर सभा घेण्यात आली. त्याला हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष आणि शेखर कनोजिया जिल्हा महासचिव आणि परेश दु्रगवार यांनी संबोधित केले. संचालन शंकर बिंझलेकर यांनी केले. मोर्चासाठी शामराव पंधराम, पुष्पा परतेकी, उर्मिला मानकर, सुमन जनबंधू, जसवंता कुंभरे, मंजु कटंगकार, रामदास नंदरधने, छत्रपाल बावने, सुनीता बावीस्कर, रेवती भारद्वाज, राकेश दियेवार, इंसाराम उईके, नरेश निनावे, संगिता मस्के, तारा निनावे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
ग्रामीणांच्या समस्या सोडवा
By admin | Updated: December 6, 2015 01:45 IST