‘मिट द प्रेस’ कार्यक्रम : जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांची भावनागोंदिया : दिड वर्षापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून येण्यापूर्वी गोंदियात कधीच आलो नव्हतो. त्यामुळे राज्याच्या टोकावरील हा नक्षलग्रस्त जिल्हा कसा असेल, तिथे विकासाच्या बाबतीत काय आव्हाने असतील, असे अनेक प्रश्न पडले होते. पण येथे आल्यानंतर एकेका गोष्टीची माहिती झाली आणि हा जिल्हा बाहेरून जसा वाटतो तसा नाही हे पटले. या जिल्ह्यात पर्यटनाला भरपूर वाव आहे. हाजरा फॉल, कचारगड, नवेगाव-नागझिऱ्यापासून तर आता सारस पक्ष्यांपर्यंत अनेक गोष्टींची देण या जिल्ह्याला मिळाली आहे. या गोष्टी मुंबईपर्यंत पोहोचवून जिल्ह्याला नवीन ओळख देण्यात आपण यशस्वी झालो याचे समाधान आहे, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाच्या वतीने सोमवारी सायंकाळी हॉटेल सागरिकामध्ये आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात डॉ.सूर्यवंशी बोलत होते. या पहिल्याच मिट द प्रेस कार्यक्रमाला गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जयस्वाल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार, महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष प्रा.डॉ.माधुरी नासरे, प्रा.सविता बेदरकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष कटरे, नगरसेवक तथा चार्टर्ड अकाऊंटंट दिनेश दादरीवाल, सावन बहेकार यांच्यासह विविध क्षेत्रातील निमंत्रित आणि पत्रकार उपस्थित होते.यावेळी पत्रकारांसह उपस्थित मान्यवरांनीही विविध क्षेत्राशी संबंधित प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना केले. त्यावर त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. गोंदिया शहरात अधिकारी राहण्यास इच्छुक नसतात. त्यासाठी काय केले पाहीजे, यावर बोलताना ते म्हणाले, कोणत्याही शहरात बदली झाल्यानंतर राहण्यासाठी येताना अधिकारी तेथील सोयीसुविधांचा विचार करतात. त्या मुलांसाठी चांगले शिक्षण, मनोरंजनाची साधने, शॉपिंग मॉल्स, गार्डन वगैरे अशा गोष्टी आज गरजेच्या झाल्या आहेत. गोंदियात आता या गोष्टी हळूहळू विकसित होत आहेत. त्याला अधिक चालना मिळाल्यास ‘विदर्भवीर’ झालेल्या अधिकाऱ्यांचे नागपूर अपडाऊन थांबविणे शक्य होईल. अधिकाऱ्यांच्या अपडाऊनमुळे कामावर निश्चित परिणाम होतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील अशा अधिकाऱ्यांना मी बऱ्याच प्रमाणात लगाम घातला असला तरी इतर कार्यालयातील सर्वांना आवर घालणे शक्य होत नाही.या जिल्ह्यात आल्यानंतर पर्यटन विकास आणि शेतीचा विकास या दोन गोष्टीवर मी जास्त फोकस केले. या जिल्ह्यात रबी हंगामात दुबार पिक घेण्याचे प्रमाण कमी आहे. पाणी पुरेसे असताना पिक न घेणे हे चित्र योग्य नव्हते. त्यामुळे जलयुक्त शिवारातून पाण्याची पातळी वाढविण्यासोबतच रबीचे क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांची पीक पद्धतीने बदलविणे, त्यांना धानपिकासोबत अधिक उत्पन्न देणाऱ्या उडीद-मुगाचे पिक घेण्यासाठी प्रवृत्त करणे एवढेच नाही तर भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्यासाठी प्रयत्न केले.सुरूवातीला प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी आणि सचिव रवी आर्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. मेठी यांनी संकल्पना मांडून परिचय दिला. संचालन जयंत शुक्ला यांनी केले. कार्यक्रमाला प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाचे उपाध्यक्ष मनोज ताजने, संतोष शर्मा, कोषाध्यक्ष हिदायत शेख, सहसचिव राहुल जोशी यांच्यासह मुकेश शर्मा, आशिष वर्मा, जावेद खान, उदय चक्रधर आदी अनेक पत्रकार उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)औद्योगिक विकासाला मर्यादागोंदिया जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी आवश्यक सुविधा असल्या तरी उद्योजक आपला फायदा पाहूनच उद्योग उभारतील. त्यामुळे त्यावर विसंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे ज्या गोष्टींना वाव आहे त्याला चालना देणे गरजेचे असल्याचे डॉ.सूर्यवंशी म्हणाले.गोंदियातील सरकारी रुग्णालयांत अनेक वेळा तणावाची परिस्थिती निर्माण होते, यामागे कामाचा ताण हे मुख्य कारण आहे. डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यातून एका डॉक्टरला जास्त वेळ ड्युटी करावी लागते. अशात थोडी गडबड झाली की रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष उद्भवतो. जोपर्यंत पूर्ण सुविधा मिळत नाही तोपर्यंत या गोष्टीला पूर्णपणे आळा घालता येणार नाही, असे ते म्हणाले.गोंदियात नोकरदार महिलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, बाल सुधारगृह, निरीक्षणगृह नाही याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. या गोष्टी पालकमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्या असून महिला व बालविकास मंत्रालयामार्फत येणाऱ्या काळात त्या गोष्टी निश्चित मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गोंदियाच्या पर्यटनाला चालना मिळाल्याचे समाधान
By admin | Updated: September 28, 2016 01:11 IST