देवरी : तालुक्यात वर्षानुवर्षे भातशेती ही एकमेव पीक पद्धती रूढ झालेली आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी माती तपासणी करून प्रत्येक शेतकऱ्याला जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनी केले.
आदिवासीबहुल नक्षलग्रस्त दुर्गम भागातील ग्राम धमदीटोला, आलेवाडा व गडेगाव येथे जमीन आरोग्य पत्रिका जनजागृती कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी उपस्थित होते. याप्रसंगी कोळी यांनी, भात पिकावर परत भात घेण्यामुळे जमीन नापीक झालेली आहे. मातीमधील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन सेंद्रियकर्ब अत्यंत कमी झाल्याने जमीन रासायनिक खतांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे सेंद्रियशेती सोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे सांगितले. कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक जी.एस. पांडे, एच.पी. वाढई, कृषी सहायक एच.झेड. शहारे, माया येरणे, गौतम, गौरीशंकर कोरे, हुडे, सचिन गावळ यांनी सहकार्य केले.