जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पर्यावरण व स्वच्छतेसाठी गटाची निर्मिती गोंदिया : शहरातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समाजासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेऊन ‘माझी भेट निसर्गासाठी’ या गटाची स्थापना केली. या गटातील काही सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नुकतीच भेट घेऊन गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना पाठबळ देण्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून व्यक्त केली. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याबाबत जिल्हाधिकऱ्यांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या गटाने त्यांच्या कार्याची सुरूवात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवडीपासून करण्याचे निश्चित केले. भविष्यात नदीची स्वच्छता करणे, पेपर, प्लास्टिक, ग्लास, पॉलीथीनचा पुनर्वापर याबाबत जनजागृती करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बदल करण्यासाठी आमचा गट काम करणार असून सोबत लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविणार असल्याचे गटातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. या गटातील जान्हवी गोयल, अमिशा रजनी, मुस्कार गुप्ता, मीरा जसानी, गुलनाझ शेख, रवी भगतानी, यश गोलानी, रितीका चचाणे, विशाल बजाज, अमीत मनकानी, रितीफ अग्रवाल, हर्ष नागदेवे, सुमीत बजाज यांचेसह तयार करण्यात आलेल्या गटातील अन्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
वृक्षलागवडीसाठी सरसावली तरूणाई
By admin | Updated: September 2, 2016 01:54 IST