गोंदिया : जिल्ह्यातून वाहणारी पांगोली नदी प्रदूषणग्रस्त झाली असून तिचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. या नदीला पुरूज्जीवित करण्यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांना समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्थेच्या वतीने रविवारी (दि.११) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्हा सीमेवर वाघ नदीत तिचे विलय होते. गोंदिया व गोरेगाव या दोन्ही तालुक्यातील शेतकरी पिकासाठी पांगोली नदीच्या पाण्यात अवलंबून असतात. हजारो शेतकरी कुटुंबांचे या पाण्यावर उदरनिर्वाह चालते. मात्र सद्यस्थितीत या नदीचे अस्तित्त्वच संपण्याच्या मार्गावर आल्याने दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांवर संकट येवू शकते. मात्र शासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. पांगोली नदीच्या पुनरूत्थानासाठी समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्थेने पुढाकार घेत नदीचे निरीक्षण केले. यात त्यांना नदीचे पात्र उथळ होत चालले असून काठावरील गावात व शहरात पाण्याची पातळी सतत खालावत आहे. नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असून काठावरील वृक्षांच्या अवैध कत्तली होत आहेत. त्यामुळे नदीचे काठच नष्ट होत आहे. काठावरील माती नदीत साचल्याने खोली कमी झाली. शिवाय शासनाने अद्यापही या नदीवर कुठेही बांध किंवा बंधारे बांधले नाही. त्यामुळे पाणी कुठेही अडविले जात नसून सरळ वाहून जाते व परिसरातील पाण्याच्या पातळीवर दुष्परिणाम होत आहे. पांगोली नदी व सहायक नाल्यांवर दूषित पाण्याचे निर्जंतुकीकरण व सांडपाणी पुनर्वापर व्यवस्थापन प्रकल्पांची शासनाकडून उभारणी न करण्यात आल्याने पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसह पाळीव पाण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. शिवाय शेतीकामे सोडून शेतकरी मोल-मजुरीच्या कामावर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकमंत्र्यांना निवेदन देतेवेळी तिर्थराज उके, गोपाल बनकर, मितेश्वर नागरिकर, भोजू राऊत, जयवंता उके, दिनेश फरकुंडे, गुड्डू मेश्राम, डिंपल उके व उमेश मेश्राम उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पांगोली वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: January 11, 2015 22:54 IST