सालेकसा : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन व उपोषण करण्यात आले.
केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर १०० दिवसांपेक्षा जास्त दिवसापासून आंदोलनाला बसले आहेत. या कालावधीत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला आहे पण हे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. तीन काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्याला मिळणारा हमीभाव, शेतकरी हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार, व्यापारी व उद्योजकांना शेतकऱ्यांची लूट करण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच देशातील शेतकरी या विरोधात पेटून उठले आहेत. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले. गेल्या सहा वर्षांपासून अव्वाच्या सव्वा कर जनतेची लूट केंद्र सरकार करीत आहे. या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कांबळे यांना देण्यात आले.
शिष्टमंडळात जिल्हा महिला काँग्रेस प्रतिनिधी वंदना काळे, जिल्हा सचिव राजू काळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चूटे, माजी जि.प. सभापती लता दोनोडे, मनोज गजभिये, नितेश शिवणकर,डॉ. संजय देशमुख, नरेशकावरे, देवराज खोटेले, जितेंद्र बल्हारे, ओमप्रकाश लिल्हारे यांचा समावेश होता.