केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी ग्रामपंचायतीकडे गावातील सार्वजनिक पथदिव्यांचे बिल थकीत असल्याने विद्युत वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांची विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तेव्हापासून अंधाराची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ग्रामपंचायतीने सार्वजनिक पथदिवे सौरउर्जेवर कार्यान्वित करून गावातील अंधाराची समस्या त्वरित सोडवावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
सार्वजनिक पथदिव्यांचे विद्युत बिल थकीत झाल्याने विद्युत वितरण कंपनीने येथील सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरावे, असे शासनाने आदेश दिले आहेत. परंतु पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील इतर विकास कामाचे नियोजन करून खर्ची घालणे असल्याने पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीने असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे विद्युत पथदिवे सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही.
.........
गावकऱ्यांची समस्या दूर करा
वीज बिल भरण्याच्या भुर्दंडापासून ग्रामपंचायतीची सुटका होऊन गावातील नागरिकांना नियमित पथदिव्यांचा प्रकाश मिळेल यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने सार्वजनिक पथदिवे सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्याचे नियोजन करून गावात सणासुदीच्या काळातही पथदिवे बंद आहेत. याचा अत्यंत त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावात निर्माण झालेली अंधाराची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.