गोंदिया : गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या शुद्धतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही पहायला मिळत आहे. मात्र हा प्रकार नियमबाह्य असताना अन्न व औषध प्रशासन विभाग त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येते.जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे आरोग्याला धोका असतो. शहरात हॉटेलांमध्ये अशा प्रकारे अशुद्ध पाणी वापरले जाते. गोंदिया शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. गोंदिया शहरातील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही येथील पाण्याचा हातगाडी व्यवसायिक उपयोग करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल त्यावेळी याच विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्य पदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिल्या जाते. अनेकदा या पाण्यात जंतू, चामडोक आढळून येतात. या हॉटेलांमध्ये बनणारे पदार्थ हे चरमरीत आणि तेलकट असतात. त्यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते. तसेच प्रत्येकाचीच असे पदार्थ खाल्ल्यावर पाणी विकत घेऊन खाण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य जास्त धोक्यात येते. (प्रतिनिधी)
उपाहारगृहांमध्ये दूषित पाणी अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: November 8, 2014 22:41 IST