सडक-अर्जुनी : यंदाच्या हंगामात डीएपी, युरिया व मिश्र खत या रासायनिक खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे असून ती कमी करण्यात यावी, या मागणीला घेऊन १५ मे रोजी सडक अर्जुनी येथील कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देऊन खताचे दर कमी करण्याची मागणी केली.
केंद्र शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताच्या किमतीत दीड पटीने अधिक वाढ केली आहे. आधीच कर्जाच्या बोज्यात सापडलेला शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. कोविड-१९ कोरोना काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला कवडीमोल किंमत मिळत असून शेतकऱ्यांचे आर्थिक हाल झाले आहेत. आधीच शेतकरी नैसर्गिक आपदा व कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अशा परिस्थितीत शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतीला लागणाऱ्या उर्वरकांच्या (रासायनिक खतांच्या) किमतीत वाढ करून शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाढ कमी करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांना माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे यांनी निवेदन दिले आहे.