राजेश मुनेश्वर सडक/अर्जुनीआधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन एका लहानशा गावात भाजीपाला पिकांचे विक्रमी घेऊन एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासोबतच शेतकऱ्यांसमोर पर्यायी पिकाचा आदर्श ठेवला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोकणा/जमीनदारी येथील डॉ.श्यामसुंदर दीक्षित व त्यांच्या पत्नी सीमा यांनी आपल्या साडेतीन एकर शेतात कारल्यांची लागवड केली आहे. यातून त्यांना १५ ते १६ लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.डॉ.दीक्षित हे नेहमी आपल्या शेतात विविध पिकांची लागवड करण्याचा प्रयोग करीत असतात. त्यांनी गावात सन २००८-०९ मध्ये तीन एकरात केळीची लागवड केली होती. यानंतर सन २०१२ मध्ये टरबुजांची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले. तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पिकापेक्षा फळपिकांमध्ये कमी श्रमात अधिक फायदा कसा घेता येऊ शकते याची उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. पिकांची निगा व बियाण्यांची पारख कशी करावी, हेसुद्धा कौशल्य त्यांच्यात आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळ्या पिकांची लागवड करून जास्त उत्पादन घेण्यासाठी त्यांनी कारल्यांची निवड केली. कारली पिकाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता डॉ.दीक्षित म्हणाले, साडेतीन एकरमध्ये कारली पिकाचे उत्पादन घेण्यासाठी गावातील १० मजुरांना कामावर ठेवले आहे. सध्या कारल्यांचे भाव ३० ते ४० रूपये किलो आहे. चांगला बाजारभाव मिळाल्याने मिळत ही अपेक्षेपेक्षा जास्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.मागील १५ दिवसांपासून दररोज पाच ते सहा पोती कारली निघत आहेत. ही कारली नागपूर, गोंदिया, देवरी, सडक/अर्जुनी, वडसा, साकोली, राजनांदगाव या ठिकाणी पाठविली जात आहे. डॉ.दीक्षित हे कारली पिकावर जैविक औषधांची फवारणी करतात. शेतकऱ्यांनीसुद्धा विषारी कीटकनाशकांची फवारणी करू नये, असा सल्ला ते देतात.
साडेतीन एकरातील कारली देणार १५ लाखांचे उत्पादन
By admin | Updated: August 30, 2014 01:47 IST