गोंदिया : पावसाळ्यात अतवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होते. परिणामी जीवित व वित्तहानीची शक्यतासुद्धा नाकरता येत नाही. त्यामुळे अशा आकस्मित उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूून पूर्वतयारी आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी डी.डी. शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांची बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख म्हणाले, आपातकालीन परिस्थितीची माहिती नियंत्रण कक्षाला उपलब्ध व्हावी व यासंदर्भात यंत्रणेला तातडीने उपाययोजना करता याव्यात यादृष्टीने जिल्हाधिकारी क ार्यालयाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवावा. संजय सरोवर पूर्ण भरल्यानंतर नदीच्या पात्रात पाणी सोडल्यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती नजरेसमोर ठेवून नदीकाठावरील गावांना धोका पोहोचणार नाही, असे अचूक नियोजन करा. अतवृष्टी व पुरामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जनजीवन सुरळीत राहण्यासाठी जिल्ह्यातील पूल व रस्त्यांची आवश्यक ती दुरुस्ती करुन घ्यावी. पूर परिस्थितीमुळे वाहतूक बंद पडल्यास याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधून मदत मिळवावी. नैसर्गिक आपत्तीच्या काळात वित्त व प्राणहानी होणार नाही, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी दक्ष राहावे. तसेच पूरपरिस्थितीमुळे साथरोग, जलजन्य आजार नेहमी उद्भवतात. अशा रोगांना नियंत्रित करण्यासाठी औषधीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करावा. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी अशा परिस्थितीत आपल्या सेवा सातत्याने द्याव्या.वीज वितरण कंपनीची चमू या काळात सज्ज असली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा नियंत्रण कक्ष व अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालय येथून पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी बोट, फायबर ड्रम, हातमोजे, झाड कटाई यंत्र, हेलमेट, लाईफ ज्ॉकेट, सर्च लाईट, हेडलाईट, स्ट्रेचर, तंबू, कुदळ, पावडे, रेनकोट, ऑक्सीजन सिलिंडर, टायर आदी साहित्य उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकार्यांनी प्रास्ताविकात दिली. बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस, आरोग्य, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
By admin | Updated: May 29, 2014 02:33 IST