आमगाव : आमगाव-कामठा या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे.
या रस्त्याने प्रवास करणारे नागरिक चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत. या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्यावरील डांबर उखडले असून, अनेक ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहेत. त्यावरून वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत केल्यासारखे आहे. यापूर्वी या रस्त्याला घेऊन काही संघटनांनी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी फक्त कामठा चौकात तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. दरम्यान, माजी आमदार संजय पुराम यांनी रस्त्याची पाहणी केली व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर करून लवकरात लवकर रस्ता तयार करण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.