संतोष बुकावन लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रत्येकाला आवडीनुसार विशिष्ट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते. यासाठी मनुष्य जीवाचे रान करतो. हल्ली महिलांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात उडी घेतली आहे. बहुधा आवड म्हणून नव्हे तर नाईलाजाने ग्रामीण भागात महिला कृषी क्षेत्राकडे वळतात. मात्र अर्जुनी मोरगावच्या निता ओंकार लांजेवार या उच्च शिक्षण घेऊनही वैशिष्ट्यपूर्ण शेती करतात हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे.सध्या उत्पादन वाढीसाठी शेतात रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. यामुळे दैनंदिन आहार हे सुद्धा विषयुक्त झाले आहे. सत्वहीन आहाराची सवय माणसाला जडत आहे. हल्ली अन्नधान्य,भाजीपाला,फळे हे शुद्ध असतील यावर विश्वासार्हता राहिली नाही. उत्पादन व त्यातून कमी उत्पन्न झाले तरी चालेल पण सेंद्रिय शेतीच करणार असे बोटावर मोजण्याइतके शेतकरी उरले आहेत. त्यातील एक म्हणजे निता लांजेवार. निता यांनी ब्राम्हणटोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली. अर्जुनी मोरगाव तालुका धान शेतीचा आहे. निता यांनी पद्धतशीर नियोजन केले. त्यांनी शेतात ठिबक सिंचनाची सुविधा केली.
शेतातून थेट ग्राहकांपर्यंत- सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला पसंत करणारी अनेक लोक आहेत. अशा लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर आज उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची नोंद केली जाते. इच्छुक व्हाॅट्सॲप धारक मोबाईलवर हव्या असलेल्या भाजीची नोंदणी करतात. जितकी नोंदणी झाली तेवढ्याच भाजीची तोडणी केली जाते. तेवढी भाजी पॅकिंग करून दिली जाते. शेतमाल शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो.
खर्च कमी-उत्पादन कमीशेणखताचा वापर होत असल्याने लागवडीचा खर्च अत्यंत कमी असतो. उत्पादन सुद्धा कमीच होते. मात्र आपण लोकांना विषमुक्त भाजी उपलब्ध करून देतो याचे मनोमन समाधान लाभते. जाणवा येथे सुद्धा एक एकर शेती आहे. तिथे सेंद्रिय शेतीतून तुलसी बासमती व रेड राईसची लागवड केली आहे. -निता ओंकार लांजेवार, महिला शेतकरी अर्जुनी मोरगाव