पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे गज वापरल्याने या कामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे ही विहिरी किती मजबूत होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वास्तविक निविदेच्या विवरणात या विहिरीसाठी १0 एमएमचा गज वापरणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात पैसे वाचविण्यासाठी भंडारा येथील कंत्राटदार शिंदे यांनी आठ एमएमचे गज रिंग बांधताना वापरले. यामुळे विहिरीचे काम हलक्या दर्जाचे होत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करुन विहीर बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला असताना कंत्राटदाराची ही कृती बांधकामाचा दर्जा कमी करणारी आहे. याप्रकरणी कंत्राटदाराकडे शहानिशा केली असता त्यांनीसुद्धा आठ एमएम लोखंडाचा वापर केल्याची कबुली दिली. वास्तविक ही विहीर नाल्याच्या जवळ आहे. त्यामुळे अतवृष्टीमुळे ही विहीर खचली तर जबाबदार कोण, असा प्रश्न गावकर्यांना पडला आहे. ‘पायवा मजबूत असला तर घर मजबूत’ अशा उक्तीप्रमाणे कंत्राटदाराने चांगले काम करायला पाहिजे, अशी अपेक्षा केली जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी या ठिकाणी बनवलेल्या विहिरीची तपासणी करून चौकशी करावी आणि हे काम अधिक चांगल्या दर्जाचे होईल याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
एक कोटीच्या नळ योजनेच्या विहिरीचे काम निकृष्ट
By admin | Updated: May 27, 2014 23:49 IST