लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूर्ण जीर्ण झाल्याने या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तर नवीन पुलाच्या सदोष बांधकामामुळे यावरून वाहतूक धोक्याची झाली आहे. परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांना सध्या अंडरग्राउंड परिसरातून वाहतूक करावी लागत आहे. पण हा मार्ग आधीच अरुंद असल्याने या ठिकाणी दिवसभरातून अनेकदा वाहतुकीची कोंडी होत आहे. तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याची जाणीव झाल्यानंतर ५ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद केला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. नवीन उड्डाणपुलावरून येण्यासाठी बराच फेरा मारून यावे लागते, तर या पुलावरून पायी ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची व्यवस्था नसल्याने त्यावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे. त्यामुळे नागरिक अंडरग्राउंड मार्गाचा मागील तीन-चार दिवसांपासून सर्वाधिक वापर करीत आहे. पण या मार्गावर सुद्धा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी या ठिकाणी अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे.
जुना उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात नाही शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. हा पूल चार महिन्यांत पाडून नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करायची आहे. पण अद्यापही संबंधित कंपनीने पूल तोडण्यास सुरुवात केली नाही तर चार महिन्यांत पूल तोडण्याचे काम पूर्ण अशक्य असल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहे. पावसाळ्यात होणार समस्या शहरातील अंडरग्राउंड परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहते. त्यामुळे बरेचदा हा मार्ग बंद असतो. त्यामुळे सध्या या मार्गाने सुरू असलेली वाहतूक कोणत्या मार्गाने करायची? असा प्रश्न आहे, तर नवीन उड्डाणपुलावर सुद्धा यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.