जिल्हाधिकारी सूर्यवंशी : शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची बैठक गोंदिया : प्राथमिक शिक्षण घेणे हा ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. सन २००९ च्या अधिकारांतर्गत प्रत्येका मुलाला मोफत आणि सक्तिचे शिक्षण मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील एकही मुल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.येत्या ४ जुलै रोजी होणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाबाबत मंगळवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जी.एन. पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एस.बी. खंडागळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. एकही मुलगा बालकामगार होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका व सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्यात यावा. ज्या यंत्रणेकडे जबाबदारी सोपविलेली आहे त्यांनी सर्वेक्षणाचे काम काळजीपुर्वक करावे. सर्वेक्षणाची कार्यपद्धती योग्यरितीने पार पाडावी. याकरीता जिल्हा, तालुका व गावस्तरावर समित्या स्थापन करुन तहसीलदारांच्या समन्वयातून लवकरात लवकर नियोजन करण्यात यावे. जेणेकरुन सर्वेक्षणातून एकही शाळाबाह्य विद्यार्थी सुटणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगीतले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी, शाळाबाह्य विद्यार्थी म्हणजे शाळेत न जाणारी मुले ज्यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्याने प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही असे ६ ते १४ वयोगटातील मुले आहेत. यामध्ये एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थितीत राहणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा देखील समावेश होतो असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी पाटील यांनी, ४ जुलै रोजी जिल्ह्यात होणाऱ्या सर्वेक्षणात शाळाबाह्य मुलांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणी, बाजार, खेडे, गाव, वाडी, पाडे, तांडे, शेतमळे, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मदरशातील बालकांना शाळाबाह्य समजून त्या बालकांचेदेखील सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले.बैठकीला सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)जिल्ह्यात आहेत २१७ शाळाबाह्य मुलेसतत ३० दिवस गैरहजर व मदरसामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना शाळाबाह्य मुले असल्याचे ठरवून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे शासनाने ठरविले आहे. या निकषानुसार जिल्ह्यात २१७ शाळाबाह्य मुले असल्याची बाब पुढे आली आहे. यात सातत्याने गैरहजर राहणाऱ्यांत आमगाव तालुक्यातील ४ व गोंदिया तालुक्यातील १९ असे २३ विद्यार्थी आहेत. तर मदरसात शिक्षण घेणारे आमगावात ७५, देवरी ३८ , गोंदिया २४, गोरेगाव ९, सडक-अर्जुनी ३८ तर तिरोडा येथील १० असे १९४ विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २१७ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे सर्व शिक्षा अभियान कार्यालयामार्फत सांगण्यात आले.
एकही मूल वंचित राहू नये
By admin | Updated: June 27, 2015 02:30 IST