सालेकसा : सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र पिपरीया समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. लोकप्रतिनिधींच्या निक्रियतेमुळे परिसराच्या विकासासाठी येथील नवयुवकांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये पिपरीया विकास परिषद संघर्ष यात्रेची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे शासनाला या क्षेत्राच्या विविध समस्यांची जाणीव करून दिली जात आहे.यामध्ये सालेकसा-रोंढा-गल्लाटोला या मुख्य मार्गाचे मजबूत डांबरीकरण, पिपरीया येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे, अप-डाऊन करणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता तत्काळ थांबविणे, काबील कास्तकारांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे. पिरीया नवागड कालव्याच्या रस्त्यावर डांबरीकरण करणे, पुनर्वसीत नवागड (पिपरीया) येथे शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून सुविधा उपलब्ध करून देणे, पिपरीया क्षेत्रात अवैध पशू व्यवसाय व गोहत्येसाठी जनावरांच्या निर्यातीवर प्रतिबंध लावण्यात यावे. रानीडोह उपसा जलसिंचन योजना सुरू करणे, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील गल्लाटोला नदीवर पुलाचे पक्के बांधकाम करणे, शिवगड मंदिराचा विकास करण्यात यावे. याशिवाय पिपरीया हे मोठे परिसर असून त्यात १८ टोल्यांचा सहभाग आहे. ही बाब लक्षात घेवून येथे शैक्षणिक सुविधा व उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करणे गरजेचे आहे. हे आदिवासीबहुल क्षेत्र असल्यामुळे आदिवासी लोकांची दिशाभूल करणाऱ्या व शैक्षणित कार्यात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. या भागातील अनेक कार्यरत शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास रखडला आहे. येथील शैक्षणिक बाब अत्यंत गंभीर असून शासनाने लक्ष न दिल्यास आदिवासी हा कायमचा आदिवासीच राहील, अशी खंत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त पिपरीया परिसर समस्यांच्या विळख्यात
By admin | Updated: January 6, 2015 23:04 IST