उगवत्या सुर्याला सलाम करण्याची परंपराच आहे. या परंपरेचा खरा प्रत्यय सध्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. प्रफुल्ल पटेल यांना हारवून नाना पटोले विजयी झाले व दोन्ही जिल्ह्यात त्यांचे सगेसोयरे अचानक वाढले. एकेकाळी भाईजींच्या मागे फिरणारेही आता नानांचे होर्डीग्स लाऊन त्यांचे शुभचिंतक असल्याचे दाखवित आहे. कित्येक असे आहेत जे फक्त आपले काम काढून घेण्यासाठीच त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता नानाभाऊंनी सावधान राहून खरोखरच आपले कोण व परके कोण याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. नानांच्या शुभेच्छा होर्डींग्सने आज शहर भरून गेले आहे. या होर्डींग्समधील आश्चर्याची बाब अशी की, यात नानांना सोडून अन्य कुणीही ओळखीचे दिसून येत नाही. त्यांच्यासोबत कधी ज्यांना बघितले नाही असेही मोठमोठाले व कित्येक होर्डींग्स लाऊन आपण त्यांचे खरे शुभचिंतक असल्याचे दाख- विण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळेच शहरात सध्या होर्डींगयुद्ध पेटले आहे. बघावे तो होर्डींगच्या माध्यमातून नानांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे. हे दाखवित आहे की, भाऊ फक्त आम्हीच तुमचे खरे चाहते आहोत. यासाठी फक्त होर्डींग्स नव्हे तर सध्या व्हॉट्सअँप व फेसबूक हे सुद्धा एक महत्वाचे माध्यम बनल्याचे दिसून येत आहे. भाऊंची लोकप्रियता आहे याबाबत काही वादच नाही. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनी आपण त्यांच्या सोबत असल्याचे निकालातून दाखवून दिले. याचा अर्थ असा नाही की, निवडणुकीत त्यांच्यासोबत मागे पुढे करणारे व नारे लावणारेच त्यांचे चाहते व त्याचे खरे शुभचिंतक आहेत. त्यांच्यासोबत फोटो न काढणारे तसेच त्यांच्या संघटनेत पद घेऊन भाऊंच्या नावाची माळ न जपणारेही कित्येक मनापासून भाऊंचे शुभचिंतक आहेत. भाईजी मंत्री असताना कित्येक त्यांच्या नावाची माळ जपत होते. कंपनीच्या कार्यालयात ठाण मांडून बसून राहत होते. आज मात्र परिस्थिती बदलली असून कंपनीत शुकशुकाट असून बघावे तो नानांची तारीफ व नानांशी जवळीक निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. कारण भाऊ उगवता सूर्य असल्याचे त्यांना वाटत आहे. परिस्थितीनुसार बदलणारे तर बदलतच्ं राहणार. मात्र कित्येक असे ही आहेत जे फक्त भाऊंचा वापर करून आपले राजकारण चालवित आहे. आपले काम काढण्यासाठी भाऊ-भाऊ करीत आहेत. आता भाऊ खासदार झाले उद्यामंत्रीपद मिळेल अशीही त्यांना आशा आहे. नेमकी हीच बाब हेरून त्यांचे जवळचे त्यांचा लाभ घेण्याचा तयारीत बसून आहेत. भाऊंच्या संघटनेच्या माध्यमातून आपण भाऊंचे किती जवळचे व किती शुभचिंतक आहोत हे दाखविणारेही भरपूर आहेत. भाऊंना येथे कुणाचे नाव सांगायची गरज नाही. ही बाब त्यांनाही चांगल्या प्रकारे माहित आहे. मात्र आता खर्या शुभचिंतकांनी जबाबदारी टाकली आहे ती सर्वांसाठीच व सर्वासामान्यांसाठीच. त्यासाठी आता भाऊंनी सावधान राहण्याची गरज आहे. खरंच आपला कोण हे जाणून घेण्याची व आपल्यांच्या गर्दीत बसूनही परका कोण त्याला ओळखण्याची. भाईजींच्या हातून हीच चूक झाली व त्याचे परिणाम काय झाले ते सर्वांना दिसले. अशी चूक भाऊंच्या हातून होऊ नये असेच त्यांच्या अनेक चाहत्यांना वाटत आहे. त्यांच्यापासून दूर असलेल्या पण मन:पूर्वक त्यांच्यासोबत असलेल्या चाहत्यांची हीच चिंता आहे.
नानांना ठेवावी लागणार आपले आणि परक्यांची जाणीव
By admin | Updated: May 22, 2014 01:15 IST