गोंदिया : चार अभयारण्य आणि एका राष्ट्रीय उद्यानामुळे तयार झालेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्य आता वाघांशिवाय पोरके झाले आहे. गेल्या अनेक वर्षांत या अभयारण्यातील ‘माई’ने अनेक वाघांना जन्म घालून व्याघ्र प्रकल्पाच्या समृद्धीत भर घातली. परंतू गेल्या ७ मे रोजी माई कायमची सोडून गेल्यानंतर नागझिरा अभयारण्यात सध्यातरी कोणत्याही वाघाचे अस्तित्व नाही.जिल्ह्यातील नवेगाव अभयारण्यात दोन नर वाघ आणि एका वाघिणीचे वास्तव्य (टी-६ ऊर्फ कानी) आहे. तसेच न्यू नागझिरा अभयारण्यात टी-४ ही वाघीण आपल्या चार महिन्यांच्या दोन छाव्यांसह पर्यटकांच्या नजरेस पडते. कोका अभयारण्यात एक नर वाघ आणि एक वाघिण आहे. नागझिरा अभयारण्यातील माईचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे वनाधिकारी सांगत असले तरी त्यासाठी इतरही कारणे पुढे येत आहेत. वन्यजीव प्रेमींशी चर्चा केल्यावर एक बाब पुढे आली आहे की, नागझिरा जंगल परिसरात हरीण, सांबर, चितळ यासारख्या लहान प्राण्यांची संख्या काहीशी घटली आहे. यामुळेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वाघांची संख्या या परिसरातील जंगलात कमी होत आहे. या जंगलांमध्ये अवैध शिकारसुद्धा होत आहे. या परिसरातील वाघ (डेंडू), वाघिण (अल्फा) व तिच्या दोन छाव्यांचा आतापर्यंत शोध लागला नाही. वनातील प्राण्यांना वनात तारांचे कुंपण घालून बांधून ठेवता येत नाही. मात्र मागील १० वर्षांत नागझिरा, न्यू नागझिरा किंवा नवेगावबांध येथे वाघांची संख्या का वाढत नाही? हा अनेकांसाठी चिंतनाचा विषय झाला आहे. जर आपल्याकडील वन्य परिसरातून वाघ-वाघिण दुसऱ्या वनात जात आहेत तर मग दुसऱ्या जंगलातील वाघ-वाघिण आपल्याकडील जंगलात का येत नाही? असेही प्रश्न निर्माण होतात. (प्रतिनिधी)सर्वाधिक जुनी वाघीण४नागझिऱ्याची (जुन्या) शान असलेली माई जंगल परिसरातील सर्वाधिक जुनी वाघीण होती. तिने पाच वेळा नागझिरा परिसरात छाव्यांना जन्म दिला आहे. म्हणून तिला ‘माई’ अर्थात मातेची उपमा दिली होती. माईने आतापर्यंत नागझिरा परिसरात १० वाघ-वाघीणींना जन्म दिल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे माईमुळे या जंगल परिसरात वाघांची संख्या वाढली. पण आता माईचे नागझिरा येथे नसणे ही एक मोठी हानी समजली जाते. नागझिरा परिसरात जखमी होऊन एखाद्या वाघ किंवा वाघिणीचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे.- वन्यजीवांच्या रक्षणासाठी हे करा४ जंगलातील सर्व रस्ते पर्यटकांसाठी उघडण्यात यावे. त्यामुळे शिकाऱ्यांमध्ये व लाकूड चोरामध्ये कोणी येईल याची भिती राहील. त्यातून शिकारीला आळा बसू शकेल, असे मत वन्यजीव प्रेमी राहुल हारोडे यांनी व्यक्त केले.४ सुनील धोटे यांनी म्हटले की, माईच्या मृत्यूवर गांभीर्याने मंथन आवश्यक आहे. अशी घटना पुन्हा होवू नये. जखमी वन्यप्राण्यांवर योग्यवेळी उपचारासाठी शासकीय तयारी असावी.४ डॉ.राजेंद्र जैन म्हणाले, नागझिरा जंगलात अनेक वाघ-वाघिण आले व गेले. परंतु माईच १५ वर्षांपासून कधीही नागझिरा सोडू शकली नाही. पर्यटक विनोदात म्हणायचे, ‘वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन केवळे माईमुळेच निघते. वेतन बिलाच्या मस्टरवर माईचे पगमार्क घेण्यात यावे.’
नागझिरा अभयारण्य वाघांविनाच!
By admin | Updated: May 11, 2016 01:38 IST