तिरोडा : जनतेला खोटी आणि मोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेची पूर्णपणे भ्रमनिराशा केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढवून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. मोदी सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेवर अन्याय केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आ. सहेषराम कोरोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, माजी आ. दिलीप बन्सोड, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा शहारे, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, धानसिंग बघेले, पी.जी.कटरे, जागेश्वर निमजे, ओम पटले, रमेश अंबुले, दुर्गेश चौरागडे, जगदीश येरोला, रामकुमार असाटी, राधेश्याम पटले, रमेश टेंभरे, ठमेंद्रसिंह चव्हाण, पूनम रहांगडाले, रुबीना मोतीवाला व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पटोले म्हणाले, केंद्र सरकारने मागील सात वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. उलट शेतकरी विरोधी कायदे करून त्यांच्यावर अन्याय केला. या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे जनतेनेच आता मोदी सरकारचा खरा चेहरा उघड करावा, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध पक्षांच्या ४३९ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत पक्षाचा दुप्पटा घालून प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जागेश्वर निमजे यांनी केले तर आभार रमेश टेंभरे यांनी मानले.